भिवंडी: ठाणे ते भिवंडी दरम्यान सुरू असलेले काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले आहे. भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रो खालून जाणार की वरून जाणार हे अजून नक्की झालेले नाही.अशा परिस्थितीमध्ये ठाणे भिवंडी दरम्यानचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याने ठाणे ते भिवंडी दरम्यान मेट्रो जानेवारी 2027 पर्यंत सुरू होऊ शकते, अशी प्रतिक्रिया आ. महेश चौघुले यांनी दिली आहे. ते मेट्रो कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
शहरात मेट्रो प्रकल्पासह एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसह शहरातील वाहतूक नियोजन या संदर्भात पालिका मुख्यालयात महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका एमएमआरडीए व मेट्रो अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली.
यावेळी आ. महेश चौघुले, आयुक्त अनमोल सागर उपस्थित होते. बैठकीस पालिका, एमएमआरडीए व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्वांनी अंजुरफाटा ते धामणकर नाका दरम्यान सुरू असलेली मेट्रो कामाची पाहणी केली.
मेट्रोचे काम प्रगतीपथावर असले तरी या परिसरात स्वच्छता रुंदीकरण झालेल्या ठिकाणी रस्ते बनविणे यासह शहरात सुरू असलेल्या कामाबाबत अनेकांनी चर्चा केली. मेट्रो दरम्यानच्या रस्ते रुंदीकरण व पुढील टप्प्यातील कल्याण रोड परिसरातील रुंदीकरण व इतर कामांना चालना मिळू शकते. महापौर नारायण चौधरी आयुक्त अनमोल सागर हे शहर विकासासाठी आग्रही असून त्यांच्या प्रयत्नातून कामे पूर्ण होतील, असा विश्वास आमदार महेश चौघुले यांनी व्यक्त केला आहे.
विकासकामांसाठी 3,771 कोटींचा निधी
पालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत एमएमआरडीए अधिकारी यांच्याकडून विविध टप्प्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी 3771 कोटी रुपयांचा निधी लागणार असून त्यामध्ये तीन टप्पे करण्यात आल्याची माहिती दिली. तर महापौर नारायण चौधरी यांनी शहरात मेट्रो सुरू होणार; परंतु या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी मेट्रो प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी केली. मेट्रो परिसरात जाहिरात फलकांच्या माध्यमातून पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळवता येईल का, यावर आयुक्तांनी चर्चा केली.