ठाणे: ठाणे पश्चिमेतील ब्रह्मांड परिसरातील आझाद नगर येथील मद्रास चाळीत शुक्रवारी दुपारी घराच्या गॅलरीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर त्याची आई आणि लहान भाऊ गंभीर जखमी झाले.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चाळीतील तीन घरे रिकामी केली आहेत. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपारी ३.३५ वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, ब्रह्मांड येथील मिशनरी चैपल चर्चजवळील मद्रास चाळीतील तळ अधिक एक मजली, सुमारे २५ ते ३० वर्षे जुन्या घराच्या गॅलरीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळला.
त्या वेळी घरात तीन जण झोपलेले होते. ढिगाऱ्याखाली अडकल्याने तिघेही जखमी झाले. जयकुमार जयस्वाल (१२) याला गंभीर दुखापत झाल्याने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेत उर्मिला जयस्वाल (३५) यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विनित जयस्वाल (९) याच्या डोक्यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरातील सुरक्षेचा विचार करून मद्रास चाळीतील तीन घरे तातडीने रिकामी करण्यात आली.
अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने धोकादायक भागाला धोकापट्टी लावली असून सार्वजनिक बांधकाम विभाग, माजीवाडा प्रभाग समिती आणि अतिक्रमण विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी उपआयुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही. एम. तडवी, पोलीस अधिकारी तसेच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक उपस्थित होते.