भिवंडी :संपूर्ण महाराष्ट्रासह देशात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी परीक्षा पेपर घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या १२ आरोपींची पोलीस कोठडीत असलेल्या मुख्य तीन आरोपींसोबत एकत्र चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालया-समोर अर्ज केल्यानंतर आज भिवंडीतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस एस घोडके यांच्या न्यायालयात गुरुवारी न्यायालयीन कोठडीतील १२ व पोलीस कोठडीतील २ अशा एकूण १४ आरोपींना हजर करण्यात आले असता सर्व आरोपींना ३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती आरोपींचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी दिली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता यास साथीदार इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकू अशा दोघांना २५ जुलै रोजी अटक केली तर बिजेंद्र गुप्ता याचा साथीदार सोनु कुमार याने २८ जुलै रोजी न्यायालया समोर आत्मसमर्पण केले. तत्पूर्वी अटक असलेल्या १२ आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. परंतु आता सर्व आरोपी अटक झाल्याने या सर्व आरोपींची एकत्र समोरासमोर चौकशी करणे कामी पोलिस
कोठडीची मागणी सहाय्यक पोलिस आयुक्त विजय मराठे यांनी न्यायालयासमोर मांडली. यावेळी आरोपींच्या वतीने अॅड. नारायण अय्यर, अॅड. जितेंद्र पाटील व अॅड शैलेश गायकवाड यांनी बाजू मांडली. याप्रकरणी न्यायालयाने सर्व १४ आरोपींना ३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याने न्यायालयीन कोठडीतील १२ आरोपींचा ताबा आता पुन्हा पोलिसांकडे आला आहे. आता या सर्व आरोपींच्या एकत्र तपासात कोणते खुलासे समोर येतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सत्य समोर येणे गरजेचे : अॅड. नारायण अय्यर
टी ई टी परीक्षा पेपर फुटीचा हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील सत्य समोर येणे गरजेचे आहे. नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार पोलिसांना तपासात नवे काही आढळून आल्यास ते ४० दिवसात पुन्हा आरोपींची पोलिस कोठडी मागू शकतात. त्यामुळे आम्हाला सुद्धा या गुन्ह्यातील सत्य समोर येणे गरजेचे असल्याने आम्ही पोलिस कोठडीसाठी सहमती दर्शविली आहे. असे आरोपींचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी स्पष्ट केले.