बोईसर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारितील तारापूर औद्योगिक क्षेत्रात गटार व्यवस्थेची दुरवस्था उघडकीस आली असून अनेक ठिकाणी गटारी तुडुंब भरून सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कामगार तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील विविध भागांमध्ये गटारींची साफसफाई अपुरी असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी गटारी साफ केल्याचा देखावा करण्यात आला असला तरी काढलेला कचरा गटारीच्या शेजारीच टाकून दिल्याने काही वेळातच तो पुन्हा गटारीत जात असल्याने परिस्थिती पूर्ववत होत असल्याची तक्रार उद्योगांतील कामगार व स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरवर्षी गटारींच्या साफसफाईसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते. मात्र प्रत्यक्षात नियमित आणि प्रभावी साफसफाई होत नसल्याने या टेंडर प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा औद्योगिक वर्तुळात सुरू आहे.
बोईसर येथील एमआयडीसी ही राज्यातील मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक मानली जाते. या परिसरात सुमारे 2100 भूखंडांपैकी 1800 औद्योगिक तर सुमारे 300 निवासी भूखंड आहेत. तसेच येथे 1200 हून अधिक लघु, मध्यम व मोठे उद्योग कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात गटारींची अशी दुरवस्था आढळून येत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून गटारींची नियमित साफसफाई करावी, तसेच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्योग क्षेत्रातील कामगार व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.