डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण जवळच्या निंबवली भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमधील एका शाळा प्रशासनाने चार विद्यार्थ्यांना तुमचा शाळेचा दाखल घरी पाठवतो, अशी ताकीद देत चौघांना घरी पाठवून दिले होते. त्यातील एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याने राहत्या घरामध्येच गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. अनिश अनिल दळवी (वय 16) असे मृत करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
निंबवलीमध्ये राहणारा अनिश दळवी हा कल्याण जवळच्या कांबा परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता अकरावीत शिकत होता. (बुधवारी दि.11) अनिशला शाळेने घरी पाठविले. अनिश जसा घरी आला तशी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आल्यानंतर पालकांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी अनिशच्या घरी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर अनिशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रुग्णालयात पाठवून दिला.
अनिशच्या पालकांचे म्हणणे आहे की, अनिशसोबत शाळेत गैरप्रकार घडला. त्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. एखादा मुलगा काही गैरप्रकार करत असेल त्याची माहिती शाळा व्यवस्थानाने पालकांना दिली पाहिजे. चार मुलांपैकी तीन मुलांच्या पालकांना शाळेने बोलावून घेतले होते. आम्हा पालकांना कोणतीही सूचना दिली गेली नाही. अनिश हा कल्याण जवळच्या एका नामांकित शाळेत अकराव्या इयत्तेत शिकत होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी शाळेवर गंभीर आरोप केले आहेत. तर शाळा प्रशासनाकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास कल्याण तालुका पोलिस करत आहेत.
अनिशने याच भीतीने त्याने जीवन संपविले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. याप्रकरणी शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे की, अनिश आणि त्याच्या मित्रांनी जे काही कृत्य केले ते पुन्हा करू नये यासाठी चौघांना निलंबित करण्याचा इशारा दिला होता. त्यांना घरी पाठविले होते. आम्ही ही कारवाई शिस्त लावण्याकरिता केली. सर्व मुले आणि मुली आम्हाला सारखी एकच आहेत. शाळेत काही गैरप्रकार होऊ नये, याकरिता ताकीद दिली होती.