शहरात भटक्या श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे pudhari news network
ठाणे

Stray Dog ​​in Thane | भिवंडीत भटक्या श्‍वानांची पुन्हा एकदा दहशत

श्वान निर्बीजीकरण बंदचा परिणाम : 39 जणांना घेतला चावा, एक गंभीर

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण तब्बल दहा वर्षांहून ही अधिक काळ बंद असल्यामुळे शहरात भटक्या श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. भिवंडी शहरात श्वान दंशाने दिवसागणीक 9 जण जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी (दि.7) दिवसभरात रुग्णालयात 39 श्वान दंशाचे रुग्ण आले असून, त्यामध्ये एकजण गंभीर जखमी आहे. हे अतिशय गंभीर असून लवकरात लवकर यावर ठोस उपाययोजना पालिकेकडून करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नदीनाका व मीठपाडा या भागात वावरणार्‍या एका भटक्या श्वानाने या भागात 13 जणांना चावा घेतला. यामध्ये शमीम शेख वय 35 या युवकाच्या चेहर्‍यावर हल्ला चढवल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या सर्वांना स्व. इंदिरा गांधी स्मृती शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे रुग्णांना रेबीज लस व प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले. तर शमीम शेख याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटने नंतर पुन्हा एकदा शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणी वर आला असून निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पालिका प्रशासन अजून किती बळींची वाट पाहणार आहे असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरात भटक्या श्वानांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्यातील अवघ्या दोन दिवसांत 125 हून अधिक जणांना श्वानाने चावा घेतल्याने जखमी झाले, तर सप्टेंबरच्या 24 दिवसांत 1578 जणांना चावा घेऊन जखमी झाले. पिसाळलेल्या श्वानाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चार वर्षीय लैबा शेख हिचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने शांतीनगर परिसरातून श्वान पकडण्याचे काम सुरू केले. केवळ दोन श्वान पकडल्यानंतर काम थांबवण्यात आले. दरम्यान निविदेला मंजुरी मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने श्वान पकडण्याचे व निर्बिजीकरणाचे काम अद्याप सुरू केलेले नाही. या दिरंगाईमुळे आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांची चिंता वाढली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

सध्या भिवंडी शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, ते शहरातील प्रत्येक भागात फिरताना दिसत आहेत. भटके श्वान गटागटाने फिरत असून ते नागरिकांचा पाठलागच करत नाहीत तर ते त्यांच्या जीवावर उठतात. अनेक वेळा पळून जाण्याच्या प्रयत्नात अनेकांचे हात-पाय तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकदा वाहनचालक देखील गंभीरपणे जखमी झाले आहेत. दरम्यान शहरातील विविध भागात विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये भटके श्वान मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

महिन्याभरात 811 श्वानदंश

सोमवारी (दि.7) दिवसभरात रुग्णालयात 39 श्वान दंशाचे रुग्ण आले असून,त्यामध्ये नदी नाका परिसरातून 3 रुग्ण आले होते.त्यापैकी शमीम शेख यांच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे रुग्णालयात रवाना केले असून संपूर्ण सप्टेंबर महिन्यात 811 श्वान दंश रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते अशी माहिती आय जी एम रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ माधवी पंधारे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT