कल्याण : कल्याण डोंबिवलीतील विविध समस्या व प्रश्नांबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधीमंडळ अधिवेशनात अनेक आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची महापालिकेने मोघम उत्तरे दिली आहे. याबाबत नगरविकास खात्याच्या मुख्य सचिवांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत उद्या उपायुक्ताना मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
विधी मंडळ अधिवेशनात आमदार राजेश मोरे, सुलभा गायकवाड, संजय केळकर आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनी प्रश्न विचारले आहे. हे प्रश्न महत्वाचे आहेत. महापालिका कर्मचारीवर्गास जुनी पेन्शन योजना लागू करा. महापालिकेच्या पदोन्नती अनियमितता झाली आहे. महापालिकेचा रुग्णालयासाठी आरक्षित असलेला भूखंड ताब्यात घ्यावा. त्याठिकाणी सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे. कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका ते काटेमानिवली या परिसरात वाहतूक कोंडी होते.
त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणचे महापालिका हद्दीतील 27 गावे आणि नवी मुंबईत समाविष्ट करण्यात आलेली 14 गावे या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे. त्याचबरोबर महापालिका हद्दीतील शिक्षकांवर अन्याय होत आहे. या विविध विषयांवर विधानसभा व विधानपरिषदेच्या विधीमंडळ अधिवेशनात आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. त्याची माहिती नगरविकास खात्याकडून वारंवार महापालिकेकडे मागण्यात आली. त्याविषयी स्मरण पत्रही देण्यात आले. महापालिका आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची मोघम उत्तरे दिल्याचे निदर्शनास आल्याने याविषयी मुख्य सचिवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची माहिती 20 मे रोजी सादर करावी. त्याचबरोबर महापालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी 21 मे रोजी मंत्रालयात पाठवावा. त्याने उपसचिव सुशिला पवार यांच्या दालनात दुपारी 2 वाजता हजर राहावे, असे नगरविकास खात्याचे अवर सचिव रविंद्र भराटे यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना आदेशित केले.