ठाणे : सुरेश साळवे
समाजमाध्यमांमुळे व्यक्तींमधील अंतर कमी झाले आहे. हजारो किलोमीटर अंतरावरील व्यक्ती दुसऱ्याशी सहज संवाद साधू शकते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माणसांना जवळ आणले आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांसह भावनिक देवाणघेवाण वाढत आहे. मात्र त्याचा गैरफायदा भामटे घेत आहेत. यातून अनेकांची कोट्यवधीची फसवणूक होत आहे. ऑनलाईन व्यवहार हे जरी प्रगती आणि अद्ययावत तंत्रज्ञान असले तरीही ते आता अभिशाप ठरत आहे.
ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यांची मोठी संख्या आहे. तर दुसरीकडे ठाण्यात मोठ्या प्रमाणात भामटे सक्रिय असून हनीट्रॅप आणि सोशल मीडियावरील विवाह जोडणाऱ्या संस्थांमधील भामट्याने तर सर्वसामान्य माणसाची घोर फसवणूक केली. या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर पोलीसही त्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे सध्या फसवणूक करणारे आणि कोट्यवधींची लूट करणारे भामटे सक्रिय झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहेत. सर्वसामान्य माणसाने आता खोट्या जाहिरातीवर विश्वास ठेवून न चालता जागृत राहणे गरजेचे आहे अन्यथा होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही.
ठाण्यातील ४० वर्षीय आणि मुंबईत मोठ्या पदावर खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या तक्रारदाराला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्यात आले. संपर्कात रहा, वेळोवेळी आर्थिक मदत कर, अन्यथा पळ काढल्यास सोशल मीडियावर खासगी फोटो व्हायरल करून बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खासगी कंपनीतील ४० वर्षीय अधिकाऱ्याला ३९ लाख ८१ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या ३५ वर्षीय महिलेसह दोघांवर कासारवडवली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील रवीकुमार (नावात बदल) हे मुंबईतील एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर अधिकारी म्हणून नोकरीला आहेत.
जून २०२३ मध्ये मुंबईच्या नामांकित हॉटेलमध्ये ते कामानिमित्त गेले असताना त्यांची मीनाक्षी (नावात बदल) हिच्याशी ओळख झाली. एकमेकांशी मोबाइलवर बोलणे सुरू झाल्यानंतर तिने त्यांच्याबद्दल काळजी आणि भावनिक आपुलकी दाखविली.
आपल्याला चांगले आयुष्य जगायचे असून, आर्थिक हातभार लावण्याची तिने त्यांना वारंवार विनंती केली. तिच्यावर विश्वास ठेवत ते तिच्याबरोबर फिरायलाही गेले, फोटोही काढले. त्यानंतर अनेक गरजांसाठी तिने त्यांच्याकडून पैसे घेतले. एवढेच नाही तर महिलेने रवीकुमारकडून तिच्या बँकॉक, व्हिएतनाम, जॉर्जिया आणि बाकू आदी देशांच्या सहलीचा खर्च घेतला. त्यापोटी तिने ४ लाख ६० हजार १६३ रुपये उकळले.
त्यानंतर तिच्या एका बँक खात्यामध्ये ९४ लाखांची रक्कम वळती करण्यात आली. अशा प्रकारे तिने त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून १ कोटी ३९ लाखांची रक्कम उकळली. हनीट्रॅपचा शेवट हा धमकावणे, ब्लॅकमेलिंग सारख्या प्रकारात रूपांतरित झाला. परिणामी रवीकुमार याने कासारवडवली येथील पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
विवाह जुळवणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून जवळीक
सोशल मीडियावर अनेक मान्यवर विश्वासाहर्तेच्या विवाह जोडणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. या संस्थाच्या जाहिरातीचे स्तोम सध्या वाढलेले आहे आणि याचाच फायदा घेऊन काही विवाह जोडणाऱ्या संस्थांमध्ये भामट्यानी शिरकाव करीत महिलांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे. नुकताच एक फसवणूकीचा प्रकार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून महिलेला तब्बल साडे आठ लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे. ३३ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.