ठाणे: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा दोन महिन्यापूर्वी शिवप्रेमींसाठी खुला करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे चौथऱ्याची भिंतीच्या दगडी कोसळल्या असून बुरुजाचे दगडही निसटण्याच्या स्थितीत आहेत. छत्रपतींच्या स्मारकामध्येही ठेकेदाराने भ्रष्ट्राचार केल्याने शिवप्रेमीकडून संताप व्यक्त केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक नाव नसून समता, प्रेरणा, आस्थेचे केंद्र आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे उभारण्यात आला आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा पुतळा म्हणजे रायगडवरील मेघडंबरीतील सिंहासनाधीश पुतळ्याची प्रतिकृती होय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठाणे नगरीमधील घोडबंदर रोड परिसरात भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होत होती. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आनंदनगरच्या नव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला.
त्याकरिता नामदार सरनाईक यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिली. किल्ले रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीमधील सिंहासनाधीश पुतळ्याप्रमाणे पुण्यातील शिल्पकार सुभाष भरेकर आणि शिल्पकार अमित भरेकर यांनी साडे आठ फुटाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश पुतळ्याची निर्मिती केली आहे.
तसेच रायगड किल्ल्यावरील मेघडंमबरी प्रमाणे 16 बाय 9 इंचाची मेघडंमबरी तयार केली आहे. किल्ल्याचे चार बुरुज बनविण्यात आले असून त्या बुरुजांवर चार तोफा आणि शस्त्रधारी मावळेही बसविण्यात आले आहेत. 30 मीटरच्या चौथऱ्यावर पुतळा बसविण्यात आले. छत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे 6 मार्च रोजी तिथीनुसार झालेल्या शिव जयंतीदिनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापौर शर्मिला पिंपोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी लोकार्पण केले आहे.
ठेकेदारावर कारवाईची मागणी
अवघ्या दोन महिन्यात या पुतळ्याच्या चौथऱ्याची एका बाजूने भिंत कोसळली आहे. भिंतीच्या दगडी कोसळलेल्या आहेत. तर बुरुजच्या भिंतीच्या दगड ही पोकळ झालेल्या दिसत आहेत. दोन दगडांमध्ये सिमेंटच भरले नसून ते कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमी करीत आहेत.