ठाणे: महायुतीमध्ये रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना झालेली ही वाटाघाटी आवडलेली नाही. ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटलेली असली तरीही या जागेच्या बदल्यात शिवसेनेला पालकमंत्रिपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात अनेक जागांवर निवडणूक बिनविरोध झाल्याने महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. या निवणुकीत एका प्रकारे महाविकास आघाडीची पिछेहाटच झाली आहे. या निवणुकीत रायगड हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात या जागेसाठी रस्सीखेच सुरू होती. परंतु ही जागा शिवसेनेला मिळण्याऐवजी राष्ट्रवादीला मिळाली. सध्या या जागेवर खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. परंतु महायुतीचा विजय झालेला असला तरीही येथे शिवसैनिकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. याच नाराजीची पहिला धक्का आता शिवसेनेला बसला आहे.
रायगडमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना झालेली ही वाटाघाटी आवडलेली नाही. ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटलेली असली तरीही या जागेच्या बदल्यात शिवसेनेला पालकमंत्रिपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
तरीदेखील पदाधिकाऱ्यांतील ही नाराजी दूर होताना दिसत नाहीये. त्याचा फटका म्हणून आता रायगडमध्या काही शिवसैनिकांनी आपले राजीनामे दिले आहेत. खालापूरचे माजी तालुकाअध्यक्ष संदेश पाटील यांच्यासह रायगडमध्ये शिवसेनेच्या एकूण 38 पदाधिकाऱ्यांनी राजीनामी दिले आहे. महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांना सहकार्य केल्यामुळेदेखील हे राजीनामे देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
असली सत्ता आम्हाला नकोय
या राजीनाम्यावर बोलताना, आम्हाला असं वाटतंय की औरंगजेबाच्या सुतारवाडीच्या तहात आम्ही पराभूत झालो. आम्हाला हे डिवचण्याचं काम आहे. मी तालुका प्रमुखपदी होतो. सत्तेत असूनही त्या पदाचा मी राजीनामा दिला आहे.
असली सत्ता आम्हाला नको आहे. आमची नाचक्की होईल, असली सत्ता आम्हाला नकोय, अशी भावना संदेश पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, रायगडमध्ये राष्ट्रवादीला आमदारकी मिळाली असल्याने आता शिवसेनेला पालकमंत्रिपद कधी दिलं जाणार? मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.