शहापूर : राजेश जागरे
शहापूर तालुक्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागली आहे. अनेक गाव-पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना विहिरी, बोअरवेल व लहान जलस्रोत आटू लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिणामी “ये रे माझ्या मागल्या” अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पाणी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांकडून होत आहे.
मार्च महिना अद्याप संपलाही नसतांना शहापूर तालुक्यातील निम्म्याहून अधिक गाव-पाडे भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल करत आहेत. सद्यस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या नोंदीनुसार तालुक्यात 8 गाव आणि 43 पाड्यांना 14 टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. मग इतर टंचाई भागात टँकर धावणार कधी, सक्रिय करणार कधी, याकडे नागरिक डोळे लावून वाट बघत आहेत. तूर्तास परिस्थिती हाताबाहेर नसली तरी आगामी दिवसांत उष्णता वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील मे दरम्यान पाणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यावर प्रशासनाला आश्चर्य वाटायला नको, असे मत व्यक्त केले जात आहे.
शहापूर तालुक्यातील कसारा भागात वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाईचे सावट घोंगावतेय. महिला विहिरीत उतरून छोट्या भांड्याने पाणी भरत असून, दुसरा एक जण विहिरीतून भरलेले पाणी खेचत आहे. एकीकडे असे भयावह चित्र आहे, तर दुसरीकडे पाणीपुरवठा विभागाच्या म्हणण्या- नुसार, ‘टँकरने पाणी सुरू आहे.’ त्यामुळे टँकरने पुरवण्यात येणारे पाणी नेमके कुठे मुरतेय असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सद्यस्थितीत कळभोंडे गावासह नवीनवाडी व लादेवाडी या वस्त्यांना दिवसाआड अर्थात आळीपाळीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पुढील टँकर येण्यासाठी दोन दिवसांची वाट बघावी लागत असल्याने पाणीटंचाईची भीषणता कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ही परिस्थिती कळबोंडे गावाची असली तरी तालुक्यातील इतर गाव-पाड्यांची अवस्था ही यापेक्षा वेगळी नाही. एकूण 51 भागांत 14 टँकरने नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो का, याकडे एकदा लक्ष दिल्यास सत्यता समोर येऊ शकते. आजमितीस गाव-वाड्या व वस्त्यांवरील विहिरी कोरड्या-ठाक पडल्याने मिळेल तेथून पाणी आणण्यास जनतेची भटकंती सुरू झाली आहे. गावापासून एक-दोन कि.मी. अंतरावरील विहिरीच्या तळाशी खड्ड्यात पाणी साचण्याची वाट पाहावी लागत आहे.
लालफितीत अडकले टँकर
येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून भीषण टंचाईचे सावट गडद होण्याची शक्यता आहे. पर्यायाने भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे. विहिरी कोरड्या ठाक पडत आहेत. त्यामुळे डोक्यावर उन्हाची झळ तर घशाला पाण्याची कोरड, अशी अवस्था निर्माण झाली आहे. परंतु प्रशासन केवळ मंजुरीची वारेमाप निविदा काढून टँकरची आकडेवाडी केव्हा आणि कशी वाढवायची इतक्यावरच लक्ष ठेवून आहे. निदान सर्व निकष बाजूला ठेवून प्रशासनाने टंचाई भागाचा विचार करून सरसकट पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी टंचाईग्रस्त भागातून पुढे येऊ लागली आहे.