शहापूर : राजेश जागरे
शहापूर तालुक्यात पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले असून टँकर संस्कृतीवर वाढते अवलंबित्व महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ठरले आहे. विहिरी आटणे, जलस्रोतांची घट आणि अनियमित पाणीपुरवठा यामुळे गावोगावी महिलांना पहाटेपासून रात्रीपर्यंत पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
पाण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणे, जड पाण्याचे भांडे वाहून नेणे आणि अपुऱ्या पाण्यावर दिवस काढणे या चक्रात महिलांचे आरोग्य ढासळत असल्याची चिंताजनक स्थिती पाणी टंचाईग्रस्त महिलांची झाली आहे.
शहापूर तालुक्यातील गावठा, तेलमवाडी, डूबाचीवाडी, कातवारवाडी, हिवाळवाडी, कोळ्याचीवाडी, शिदवाडी, भेंडीचीवाडी, भगतवाडी, खडकवाडी, आघाणवाडी, खरंब्याचीवाडी, चिंचवाडी, पाणोटा, निरगुडवाडी, कवट्याचीवाडी, आदी साडेतीन हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पाड्यांमध्ये महिलांचे आयुष्य पाण्यासाठीच्या संघर्षातच संपत आहे. पाणी मिळवतांना त्यांचे आरोग्य व त्यांचा सन्मान हरवत असल्याची भावना मालू हुमणे, पप्पू वाघ, प्रकाश खोडका, लक्ष्मी वाघ, गणेश ठाकरे, रामा आघण, सविता सोंगाल, सावित्री उघडे आदींनी दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले.
तालुक्यात 2026 मध्ये म्हणजे 17 फेब्रुवारीपासूनच टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी चार टँकरला मंजुरी मिळाली असून कसारा खु, कोथळे, धामणी, वाशाळा, ग्रामपंचायत मिळून नारळवाडी, पारधवाडी, पाटोळपाडा, नवीन बाडी, उंबरखांड, भोयेपाडा, मुसळेपाडा, सखाराममपाडा, राईचीवाडी मिळून 4 हजार 441 लोकसंख्येला पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर 17 कोटी 29 लाखांचा आराखडा मंजूर असून जून अखेरपर्यंत
44 टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असल्याची माहिती शहापूर पंचायत समिती पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली. एकीकडे धरणांचा तालुका असलेल्या शहापूर तालुका टँकरमुक्त करण्यासाठी टँकरवर दरवर्षी करोडो रुपये खर्च होतात. तर दुसरीकडे करोडो रुपयांच्या पाणी योजना टक्केवारीच्या गर्तेत अडकल्याचे दिसून येत आहेत. तथापि स्थानिक आरोग्यसेवकांच्या मते सतत जड वजन उचलल्याने पाठदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी यांसारख्या समस्या महिलांना वाढल्या आहेत. उष्माघात, रक्तदाबातील चढ-उतार, तसेच स्वच्छतेअभावी त्वचारोग आणि मूत्रमार्ग संसर्ग यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते.
अपुऱ्या पाण्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेत तडजोड करावी लागत असल्याने महिलांच्या प्रजनन आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहेत. ग्रामस्थांच्या मते, टँकरचे वेळापत्रक अनिश्चित असते. कधी दिवसातून एकदाच पाणी मिळते, तर कधी दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागते. वाढत्या मागणीमुळे दरातही चढ-उतार होत असून कुटुंबांच्या मासिक खर्चात भर पडत आहे. पर्यायी पाणी मिळवतांना होणारी ढकलाढकली, वाद आणि तणाव यामुळे महिलांवर मानसिक दबाव वाढत असल्याचे सांगितले जाते.
पाणी साठवण प्रकल्प, नळयोजनेचे मजबुतीकरण, गळती नियंत्रण, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेनवॉटर हार्वेस्टिंग) आणि स्थानिक जलस्रोतांचे पुनर्भरण या उपायांवर तातडीने काम होणे गरजेचे आहे. जलव्यवस्थापन तज्ज्ञांच्या मते, टँकर हा तात्पुरता पर्याय आहे. त्यासाठी टिकाऊ समाधानासाठी स्थानिक पातळीवर जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाची एकात्मिक योजना राबवणे अत्यावश्यक आहे. महिलांच्या आरोग्याचा विचार करून पाणीपुरवठ्याचे नियोजन, जवळच्या नळबिंदूंची उपलब्धता आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे. तथापि शहापूरमधील पाणीटंचाई हा केवळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न नसून तो महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि सन्मानाशी निगडित सामाजिक प्रश्न बनला आहे. तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीच या पाणीसंग्रामला शाश्वत दिलासा देऊ शकते.