नेवाळी: कल्याण पूर्वेतील नेवाळी येथील दुर्गामाता नगर परिसरातील नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र विद्युत टंचाईचा सामना करावा लागत आहे. भर उन्हाळ्यात आणि वाढत्या उकाड्यात नागरिकांचे हाल होत आहेत. तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असताना नागरिकांनी अक्षरशः रात्र जागून काढल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या समस्येची पाहणी करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत त्यांच्या समोरच आपली व्यथा मांडली आहे. नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास यावा यासाठी भर उन्हात त्यांना उभे ठेवून परिसरातील परिस्थिती दाखवण्यात आली आहे.
नेवाळी परिसरात झपाट्याने नागरिकीकरण वाढत असताना त्यानुसार वीज वितरण व्यवस्थेचे नियोजन होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमितपणे वीजबिलांचा भरणा करूनही समाधानकारक सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख चैनु जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या साडेतीन महिन्यांपासून दुर्गामाता नगरमध्ये दररोज रात्री वीजपुरवठा खंडित होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुरुस्ती केली जाते.
या समस्येबाबत अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी अधिकाऱ्यांसह खासदारांच्या स्वीय सहाय्यकांनाही परिसरात बोलावण्यात आले होते.
जाधव पुढे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत नागरिकांना सातत्याने अंधाराचा सामना करावा लागत असताना वीजबिलांमध्ये मात्र तिप्पट वाढ झाली आहे. याचा जाब विचारण्यासाठीच अधिकाऱ्यांना येथे बोलावण्यात आले होते.
येत्या आठ दिवसांत दुर्गामाता नगर परिसरातील वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला नाही, तर शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.