नेवाळी : रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊरायाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या लाडक्या बहिणींची यंदा कल्याण-शीळ मार्गावरच परीक्षा होण्याची शक्यता आहे. कल्याण-शीळ रस्ता, काटई पाइपलाईन-अंबरनाथ महामार्ग तसेच कल्याण फाटा परिसरातील नेहमीची वाहतूक कोंडी आणि त्यातच सुरू असलेली विविध विकासकामे पाहता रक्षाबंधनच्या दिवशी वाहतुकीचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी झालेल्या वाहतूक कोंडीचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला होता. त्यामुळे यंदा प्रशासन या अनुभवातून धडा घेऊन वाहतूक नियोजन करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.कल्याण शीळ मार्गावर मेट्रो -१२चे सुरू असलेले काम, रस्त्यावरील अतिक्रमणे, अरुंद झालेल्या मार्गिका आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
सकाळच्या वेळेत भाऊरायाच्या घरी जाण्यासाठी तसेच दुपारनंतर व सायंकाळच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा वाहनांची संख्या वाढल्यास कोंडी तीव्र होण्याची शक्यता आहे.काटई पाइपलाईन अंबरनाथ महामार्गाची परिस्थितीही वेगळी नाही.
या मार्गावर सुरू असलेली कामे, खड्डे आणि वाढता वाहतुकीचा ताण यामुळे ऐन सणाच्या दिवशी वाहनचालकांची कोंडी होण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी कुटुंबासह प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना कोंडीत तासन्तास अडकावे लागू नये, यासाठी वाहतूक शाखेने विशेष नियोजन करणे गरजेचे आहे.
कल्याण फाटा शीळफाटा परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी नुकतीच प्रशासनाची बैठक झाली असून अतिक्रमण हटविणे, एकेरी वाहतूक व्यवस्था, ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती व राँग साईड वाहनांवर कारवाईचे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र या निर्णयांची अंमलबजावणी सणाच्या दिवशी कितपत होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोंडीमुक्त प्रवास हवा...
रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहिणींना राखी बांधण्यासाठी जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, एवढीच अपेक्षा नागरिकांची आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाला कोंडीमुक्त प्रवास देण्याची जबाबदारी प्रशासन पार पाडणार का? याकडे कल्याण-डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.