ठाणे : गावदेवी भाजी मंडईला लागलेल्या भीषण आगीत पालिकेचे अग्निशमन अधिकाऱ्यासह एका सुरक्षारक्षकाचा मृत्यु झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही आग कशामुळे लागली? आगीचे नेमके कारण काय? आग लावली की लागली याचा छडा अद्याप लागलेला नाही.
24 तास उलटले तरी आगीचे कारण अस्पष्ट असून प्रशासनातील अधिकारी बोलायला तयार नाहीत. दरम्यान, हकनाक बळी गेलेल्या दोघांच्या मृत्यूनंतर आता तरी प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
ठाण्याच्या गोखले रोडवरील गावदेवी भाजी मंडईला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर, तीन अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या मंडईच्या अग्नितांडवात दोन जीव घेतल्यानंतर पालिकेच्या कारभारावर चोफेर टीका होऊ लागली आहे.
भाजी विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या मंडईत प्रत्यक्षात कपडे, चप्पल आणि इतर व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. याबाबत अनेकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कानाडोळा करून वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पालिकेचे दुर्लक्ष आणि बेकायदा व्यवसाय वापर बदल आगीस कारणीभूत ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.
अग्निशमन दलात भरती प्रक्रिया अजून झालेली नाही. अग्निशमन दल कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या, नाहीतर आज सर्वच कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. पैसे खाण्याचे काम सुरू आहे अशा शब्दात ठाण्यातील आगडोंब प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांचा संताप व्यक्त केला. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. येथे माणस मृत्यूमुखी पडत आहे. एक महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी आव्हाड यांनी शुक्रवारीही केली.
2019 मध्ये भाजपचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, नोटिसांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. भाजी मंडईला बेकायदा दुकानांनी वेढलेले असल्याच्या अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्ते राहुल शेलार यांनी पालिकेकडे केली होती.
दरम्यान, या दुर्घटनेमागे ठाणे महापालिकेची निष्क्रियता असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. दुर्घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडली असून या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केली आहे.