मिरा रोड: बनावट कागदपत्रे, खोटे शासकीय शिक्के आणि सीलचा वापर करून उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय मिरा-भाईंदर येथून बेकायदेशीररित्या ऑटो रिक्षा परवाना (बॅज) आणि परमिट मिळवणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 27 जणांविरुद्ध काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिरा-भाईंदर शहरात बनावट रिक्षा बॅच व परमिट बनवण्याचा गैरप्रकार सुरू होता. आरोपींनी संगनमत करून रिक्षा बॅज आणि परमिट मिळवण्यासाठी कागदपत्रांची मोठी फेरफार केली होती.
एकाच क्रमांकावर अनेक बनावट रेशन कार्ड तयार करून त्याद्वारे इतर कागदपत्र बनवणे, आधार कार्डावरील मूळ माहितीत फेरफार करणे, महापालिकेचे बनावट जन्म दाखले आणि रहिवासी दाखले तयार करणे, बनावट वीज देयके तयार करणे, खोट्या शासकीय शिक्क्यांचा वापर करून कागदपत्रे बनवले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
या घोटाळ्याबाबत आमदार नरेंद्र मेहता यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत परिवहन विभागात बोगस बनावट दाखले बनवून परमिट, बॅच बनवले जात असून यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार केली होती.
परिवहन मंत्र्यांच्या स्वतःच्या विभागात असा मोठा घोटाळा होणे लाजीरवाणी बाब असून, राज्यातील इतर आरटीओ कार्यालयांचीही चौकशी व्हायला करून संबंधित अधिकारी यांच्या वर कारवाई करण्याची मागणी आमदार मेहता यांनी केली आहे.
काशीगाव पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारीनुसार, प्राथमिक तपासात तथ्य आढळल्यानंतर गुरुवारी रात्री 27 बॅज धारकांसह, त्यांना बनावट दस्तावेज पुरवणारे अज्ञात दलाल आणि मदत करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील सखोल तपास गुन्हे शाखा-1 यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.