डोंबिवली : पालेगाव परिसरात बैलगाडीला एका डम्परने जोराची धडक दिली होती. या डम्परच्या धडकेत बैलगाडीमधील शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्याला त्याच्या मृत्यू पश्चात न्याय मिळाला आहे. सदर शेतकऱ्याच्या मृत्युप्रकरणी त्याच्या वारसांनी मोटार अपघात वाहन न्याय प्राधिकरणाकडे भरपाईसाठी दावा दाखल केला होता. 23 वर्ष भरपाईसाठी लढा दिल्यानंतर मृत शेतकऱ्याच्या वारसांना न्यायधिकरणाचे न्यायाधीश पी. आर. अस्थुरकर यांनी डम्परचा मालक आणि त्या वाहनाची विमा कंंपनी यांना 2 लाख 80 हजार रूपये नुकसान भरपाई निकालाच्या दिवसांपासून 6 टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले.
उल्हासनगर जवळच्या ग्रामीण भागातील शेतकरी भाऊ वाळकू गायकर (66) हे बैलगाडी अपघातात मरण पावले होते. भाऊ यांचे वारस रमाबाई भाऊ गायकर, मोतिराम भाऊ गायकर, मारूती भाऊ गायकर, अनिता संतोष गायकर आणि भावना संतोष गायकर यांनी भरपाईप्रकरणी मोटार अपघात प्राधिकरणाकडे दावा दाखल केला होता. दिवंगत शेतकरी भाऊ गायकर यांच्या वारसांतर्फे ॲड. प्रमोद पाटील, डम्पर मालकाच्यावतीने ॲड. व्ही. बी. पाटील, नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्यावतीने ॲड. अरविंद तिवारी यांनी न्यायाधिकरणासमोर बाजू मांडली.
डम्पर चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा बैलगाडी अपघात झाला. यामध्ये भाऊ गायकर यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष न्यायाधिकरणाने पोलिसांच्या चौकशी अहवालाच्या आधारे निर्णय देताना नोंदविला.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी, की उल्हासनगरजवळच्या पाले गावातील शेतकरी भाऊ गायकर हे 16 एप्रिल 1996 मध्ये आपली शेतीची कामे उरकून रस्त्याच्या एका बाजूने बैलगाडीने चालले होते. इतक्या त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात एक डम्पर आला. त्या डम्परने बैलगाडीला पाठीमागून जोरदार ठोकर दिली. या धडकेत बैलगाडीवान भाऊ गायकर जागीच ठार झाले. यात बैलगाडीचे देखिल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भाऊ यांचा मुलगा मोतिराम आणि इतर वारसांनी ॲड. प्रमोद पाटील यांच्यातर्फे भरपाईसाठी या प्रकरणी मोटार वाहन अपघात न्यायधिकरणाकडे दावा दाखल केला होता.
भाऊ यांचे महिन्याचे उत्पन्न दोन हजार रूपये होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 66 होते. न्यायालयाने त्यांच्या भविष्यकालीन जीवन वाटचालीचा विचार करून भाऊ यांचे हयात असतानाचे 90 हजार रूपये, त्यानंतरच्या जीवन वाटचालीचे एकूण 1 लाख 60 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे मत नोंंदविले. इतर खर्चासाठी 15 हजार रूपये अशी एकूण 2 लाख 60 हजार रूपयांची भरपाई न्यायाधिकरणाने देण्याचे आदेश प्रतिवादींना दिले.
23.11 वर्षे खटला का चालला?; न्यायाधिकरणाचा सवाल
प्रतिवादींनी त्रृटी काढून दावे फेटाळण्याची मागणी केली. न्यायाधिकरणाने ती फेटाळली. 23 वर्ष 11 महिने 16 दिवस एवढा प्रदीर्घ काळ हा दावा का चालला? या बद्दल न्यायाधिकरणाने आश्चर्य व्यक्त केले. भरपाईचा दावा अंतिम टप्प्यात असताना भरपाई दावेदारांकडून वारसदार रमाबाई भाऊ गायकर यांचा 2005 मध्ये मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र न्यायाधिकरणासमोर सादर केले. यावेळी न्यायालयाने 20 वर्षांनंतर हे प्रमाणपत्र का सादर केले ? असे प्रश्न करून दावा दाखल केल्याच्या तारखेऐवजी निकाल दिल्याच्या 6 नोव्हेंंबर 2025 या तारखेपासून प्रतिवादींनी भरपाई देण्याचे आदेश दिले. मोतिराम आणि मारूती यांनी प्रत्येकी 93 हजार आणि आणि अनिता व काजल गायकर यांनी प्रति 47 हजार रूपये वाटून घेण्याचे आदेश दिले.