Nilje Dombivli Bus Service
डोंबिवली : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये असलेल्या लोढा हेवन/निळजे परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. बंद पडलेली निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक ही बससेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यानंतर गुरूवारपासून (दि. ११) पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मनसेचे नेते तथा माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
लोढा हेवन, निळजे परिसरातील नागरिकांनी ही बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी राजू पाटील यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या या रास्त मागणीची तात्काळ दखल घेत पाटील यांनी परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि गुरूवारपासून ही बससेवा पूर्ववत सुरू केली.
यावेळी या बसमार्गावर होणारे अतिक्रमण, फेरीवाल्यांचा वाढता त्रास, तसेच अवैध पार्किंगमुळे वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. बससेवा सुरळीत व नियमितपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील प्रवाशांना नेहमीच भेडसावणारी समस्या दूर करण्याकरिता ही बससेवा सुरू होणे गरजेचे होते. त्यासाठी मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाकडे पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा सुरू केला होता.
प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी मनसे नेहमीच तत्पर असून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील, अशा भावना मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरूण जांभळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.
पहिल्या फेरीला मान्यवरांची उपस्थिती
गुरूवारी सुरू झालेल्या बससेवेच्या पहिल्या फेरीप्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, विभागाध्यक्ष रोहित भोईर, विभाग सचिव दीपक पवार, निवृत्ती पाटील, विभाग सचिव पुष्पा भोर, वाहतूक सेनेचे अनुज दिवेकर, उपविभागाध्यक्ष अशोक गायकर, शाखाध्यक्ष राजेश काशीकर यांच्यासह इतर पदाधिकारी, नागरिक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी चालक-वाहक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला व नारळ वाढवून या प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रशासनाला मनसेचा इशारा
याच माध्यमातून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात आले आहे की, फेरीवाले व अवैध पार्किंग यांमुळे ही बससेवा पुन्हा बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मनसेने दिला आहे.