नेवाळी: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 14 गावांमध्ये प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ठाणे तालुक्यातील पिंपरी व ठाकूर पाडा परिसरातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात रासायनिक कचरा टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखो रासायनिक वेस्टच्या गोण्या डोंगर परिसरात भरून टाकण्यात आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा हा थेट ग्रामीण भागातील डोंगराळ पट्ट्यात आणून टाकण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जागोजागी रसायनांनी भरलेल्या गोण्यांचे ढिगारे साठवण्यात आले असून काही ठिकाणी जमिनीतून धूरही निघताना दिसत आहे. त्यामुळे परिसरातील हवा, माती आणि भूजल दूषित होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मते, या रासायनिक कचऱ्यामुळे परिसरातील वन्यजीव पूर्णपणे गायब झाले आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणात दिसणारे पक्षी, साप, ससे तसेच इतर वन्यजीव आता दिसेनासे झाले आहेत. इतकेच नव्हे तर या विषारी रसायनांमुळे संबंधित भागातील वनसृष्टी पुन्हा उभी राहणेही कठीण होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, 14 गावांमधील या गंभीर प्रकाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नवी मुंबई महानगरपालिका गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
14 गावांच्या डोंगरांवर सुरू असलेला हा रासायनिक कचऱ्याचा खेळ नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे. या संदर्भात स्थानिकांनी लोकप्रतिनिधींकडे याबाबतच्या तक्रारी सुद्धा केल्या आहेत.