Narali Purnima 2026 Pudhari
ठाणे

Narali Purnima 2026: कोकणात नारळी पौर्णिमेचा उत्साह; किनाऱ्यावर लगबग

नारळ अर्पण करून नव्या मासेमारी हंगामाचे स्वागत

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: कोकण किनारपट्टीवर नारळी पौर्णिमेची चाहूल लागताच कोळीवाड्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मच्छीमार बांधवांकडून होड्यांची रंगरंगोटी, दुरुस्ती आणि सजावटीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, नारळ, फुले आणि पूजेच्या साहित्याची तयारी सुरू झाली आहे.

मुंबई, नवी मुंबईपासून ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपर्यंत सणाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी नारळी पौर्णिमा साजरी होणार असून, समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित मासेमारी आणि भरघोस मासळी मिळावी, अशी प्रार्थना करण्याची कोळी समाजाची परंपरा आहे.

नारळी पौर्णिमा हा कोळी समाजासाठी केवळ धार्मिक विधी नसून समुद्राशी आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. वर्षातील काही काळ खवळलेल्या समुद्रामुळे मासेमारीपासून दूर राहिल्यानंतर या सणानंतर नव्या मासेमारी हंगामाच्या प्रारंभाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे होडीला सजवून, तिची पूजा करून समुद्राला श्रीफळ अर्पण केले जाते.

समुद्र हा उपजीविकेचा आधार असल्याने त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या परंपरेच्या केंद्रस्थानी आहे. त्याच दिवशी रक्षाबंधनही असल्याने कोळीवाड्यांमध्ये समुद्रपूजनासोबत कुटुंबातील सणाचाही उत्साह पाहायला मिळतो.

घराघरांत नारळीभातासह नारळापासून विविध पदार्थ तयार केले जातात. परंपरेतून पर्यावरणाचा संदेशही या सणातून दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT