मुंब्रा: मुंब्रा-कौशा परिसरात सध्या डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून, नागरिकांना सायंकाळनंतर घराचे दरवाजे-खिडक्या बंद करून बसण्याची वेळ आली आहे. ठाकूरपाडा, अमृतनगर, शंकर मंदिर परिसर, जीवन बाग तसेच कौशा परिसरातील अनेक भागांत डासांचे अक्षरशः थैमान सुरू आहे.
पावसाळ्यात साचलेले पाणी, नाले-गटारांमधील अस्वच्छता, कचरा आणि विविध ठिकाणी निर्माण झालेली पाण्याची डबकी यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.
त्यातच मुंब्रा-कौशा परिसरातील दाट लोकवस्तीमुळे डासांचा त्रास अधिक तीव्र जाणवत आहे. सायंकाळ होताच घराबाहेर, इमारतींच्या आवारात, रस्त्यांवर तसेच दुकानांच्या परिसरात डासांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिक सांगतात.
दरम्यान, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंब्रा-कौशा परिसरात नियमित धूरफवारणी, औषधफवारणी, साचलेल्या पाण्याची तपासणी आणि डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याची मोहीम तातडीने राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुंब्र्यातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डासांचा प्रादुर्भाव वाढूनही अनेक भागांत नियमित धूरफवारणी होताना दिसत नाही. काही ठिकाणी औषधफवारणीसाठी पथके येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. डासांचा उपद्रव वाढल्यानंतरच पालिकेने हालचाल करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.
डेंग्यू-मलेरियाची आकडेवारी चिंताजनक
डासांपासून पसरणाऱ्या आजारांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मागील वर्षाची आकडेवारीही चिंतेत भर टाकणारी आहे. २०२५ मध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत डेंग्यूचे ४०५ तर मलेरियाचे ६२१ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली होती.
त्यापूर्वी जुलै महिन्यात डेंग्यूचे १५६, तर ऑगस्टमध्ये तब्बल २४३ रुग्ण आढळले होते. तसेच २०२५ मध्ये १ ते २१ जुलैदरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रातच डेंग्यूचे ८२ आणि मलेरियाचे ५१ रुग्ण नोंदविण्यात आले होते.
संध्याकाळ झाली की घरात डासांचा अक्षरशः सुळसुळाट होतो. लहान मुलांना आणि ज्येष्ठांना डासांपासून वाचवण्यासाठी सतत काळजी घ्यावी लागत आहे. परिसरात नियमित धूरफवारणी आणि औषधफवारणी होत असेल तर ती आम्हाला दिसत नाही. पालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ न करता तातडीने उपाययोजना कराव्यात.- अयुब मलिक, स्थानिक नागरिक