मुंब्रा : मध्य रेल्वेवरील तुफान गर्दीमुळे हैराण झालेल्या मुंब्रावासीयांसाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या लोकल गाड्यांच्या मोठ्या विस्ताराची घोषणा केली आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी होणार आहे.
मुंब्रा-कौसा परिसरातील वाढत्या नागरी आणि पायाभूत समस्यांवर मात करण्यासाठी आज नागरिक आणि प्रशासनाच्या संयुक्त सहभागातून एका नवीन मंचाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. "जिम्मेदार कोण?" फोरम असे नाव असलेल्या या नागरी उपक्रमात ठाणे महानगरपालिका, मुंब्रा वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिक-स्वयंसेवक एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.
प्रशासकीय दिरंगाई दूर सारून रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन समस्या थेट ऑन-ग्राउंड अधिकाऱ्यांकडे मांडण्याची आणि त्यांचा पाठपुरावा करण्याची सुविधा या मंचाद्वारे मिळणार आहे. स्थानिक प्रभाग समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पावसाळ्यात मुंब्रा-कौसा पट्ट्याला भेडसावणारे विजेचे लपंडाव, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, मुख्य रस्त्यांची झालेली दुर्दशा व तुंबलेल्या नाल्यांची समस्या सोडवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा मोठा दिलासा
मध्य रेल्वेवरील तुफान गर्दीमुळे हैराण झालेल्या मुंब्रावासीयांना लोकलच्या घोषणेमळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुंब्रा खाडीजवळील रेल्वे रुळांवर झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या लोकल गाड्यांच्या मोठ्या विस्ताराची घोषणा केली आहे.
प्रवाशांना मिळणार दिलासा
देशातील तीन प्रमुख रेल्वे निर्मिती कारखान्यांमध्ये २३८ अत्याधुनिक, वातानुकूलित लोकल गाड्यांची निर्मिती एकाच वेळी सुरू करण्यात आली आहे. या उच्च क्षमतेच्या लोकल गाड्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला रुळावर येण्याची शक्यता आहे. या नव्या गाड्यांमुळे लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ होईल आणि दररोज मुंबई व ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो मुंब्रावासीयांना गर्दीच्या व धोकादायक प्रवासातून मोठा दिलासा मिळेल, असे वाहतूक तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.