राजेश जागरे
शहापूर: मुंबई-नाशिक महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांनी विकास लहू गोरे या टीडीआरएफ जवानाचा बळी घेतला. सोमवारी सकाळी गोरे बुलेटवरून कर्तव्यावर जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावरील भारंगी नदीजवळील मोठ्या खड्ड्यात बुलेटचे चाक जाऊन झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी शहापूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
विकास गोरे ठाणे आपत्ती प्रतिसाद दलामध्ये २०१९मध्ये भरती झाले होते. २०२४ मध्ये ते सेवेत कायम झाले. त्यांनी नुकत्याच भिवंडीतील इमारत दुर्घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बचावकार्य केले.
तसेच दहा मृतदेह ढिगार्याखालून बाहेर काढले होते. दरम्यान, गोरे यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये ठाणे महापालिकेकडून विमाअंतर्गत देण्यात येणार असून त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांच्या जागी कामावर रुजू करून घेण्यात येईल, अशी माहिती ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिली.
शहापूर तालुक्यातील बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांना तीन महिन्यांच्या दोन जुळ्या मुली आहेत. गोरे यांच्या निधनाने त्यांच्या पत्नीवर आभाळ कोसळले असून या दोन लहान मुलींना मी कसे सांभाळू, असा टाहो त्यांनी फोडला. गोरे यांच्या आईनेही आकांत मांडला. आमचे सर्वस्व गेले, आता आम्ही कसे जगायचे, असा प्रश्न त्यांच्या आईने उपस्थित केला.