डोंबिवली: नीट आणि टीएटी परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण ताजे असताना मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदाच्या भरतीसाठी सुरू असलेल्या टायपिंग टेस्टदरम्यान कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीक्षा केंद्रावर रविवारी मोठा गोंधळ उडाला.
संगणक आणि कीबोर्डमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा अर्ध्यावर थांबवावी लागली. यामुळे संतप्त झालेल्या सुमारे ५०० परीक्षार्थी उमेदवारांनी केंद्राबाहेर ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
उच्च न्यायालयातील ८०० लिपिक पदासाठी आज परीक्षा आजोजित करण्यात आली होती. राज्यभरात विविध ठिकाणी परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. जवळपास ७ हजार उमेदवारांनी लिपिक पदासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ५०० उमेदवारांची परीक्षा कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परीक्षा केंद्रात होती.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पाेहोचले. ५०० परीक्षार्थींची परीक्षा तीन बॅचमध्ये घेतली जाणार होती. परीक्षा दिल्यावर लगेच त्याचा निकाल येणार होता. मात्र परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रात गेले. त्याठिकाणी सर्व्हरच डाऊन होते.
काही परीक्षा रुममध्ये अंधार होता. काहींच्या संगणकाचा किबोर्ड नीट काम करीत नव्हता. त्यामुळे परीक्षा दिल्यावर निकालाची प्रिंट येत नव्हती. अनेक संगणक हँग होऊ लागले. काही ठिकाणी बोर्डची बटणे काम करत नव्हती, तर काही संगणकांमध्ये इंटरनल एररचे मेसेज येऊ लागले. जुनी आणि धुळखात पडलेली यंत्रणा वापरल्याचा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला.
या विविध समस्यांचा समाना करावा लागल्याने पहिली बॅच परिक्षा रुममध्ये गेली ती लवकर परत आली नाही. त्यामुळे दुसऱ्या आणि तीसऱ्या बॅचची मुले साडे तीन वाजेपर्यंत बाहेरच ताटकळत होती. हा गोंधळ परिक्षा केंद्रावर उडाल्याने त्याठिकाणी पोलिसांना पाचारण करावे लागले. अखेरीस कल्याण न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही पाचारण केले.
ही माहिती मिळताच अधिकारी आणि हायकोर्ट भरती विभागाचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी चर्चा करून तांत्रिक दोष दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत लेखी स्वरूपात पुन्हा परीक्षेची तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही अशी ठाम भूमिका परीक्षार्थी उमेदवारांनी घेतली.