मिरा रोड: २४ वर्षीय तरुणाचे दोन चारचाकी वाहनांतून आलेल्या चौघांनी जबरदस्तीने अपहरण करून त्याला बेदम मारहाण करत तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना मिरा रोडच्या कनाकिया परिसरात घडली.
पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तरुणाला विविध ठिकाणी गाडीतून फिरवत मारहाण, शिवीगाळ करण्यात आली. अखेर त्याला मूळ ठिकाणी आणून सोडण्यात आले. याप्रकरणी नवघर पोलिसांनी चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आर्यन तरुण उपाध्याय (२४, रा. कनाकिया, मिरा रोड) हे १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेएकच्या सुमारास मित्र नविन सिंग याच्यासोबत डिवाईन चर्च, महालक्ष्मी भोजनालयाजवळ उभे होते. त्याचवेळी टोयोटा आणि स्विफ्ट कारमधून चौघे तेथे आले.
त्यापैकी ओळखीचा असलेला रमण शर्मा उर्फ रमण गोलू आणि त्याचा साथीदार विशाल यांनी आर्यन यांना जबरदस्तीने टोयोटा कारमध्ये कोंबले. गाडीत बसवल्यानंतर रमण शर्मा याने मुझे पैसा चाहिये, अशी धमकी देत आर्यन यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.
पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर आरोपींनी आर्यन यांना कनाकिया, लुडो क्लब परिसर तसेच एस. के. स्टोन परिसरात गाडीतून फिरवले.
काही वेळाने त्यांना पुन्हा मूळ ठिकाणी आणून सोडण्यात आले. या घटनेनंतर आर्यन यांनी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रमण शर्मा (२९), विशाल (२७), अभिषेक सिंग (२२) आणि मेहुल भरवाड उर्फ लाला (२२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.