भाईंदर: १४५ मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांमध्ये प्रशासकीय निष्काळजीपणा व राजकीय कारस्थानातून अनेक बोगस मतदारांची नावे नोंदविण्यात आल्याचा गंभीर आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
हा प्रकार नुकत्याच पार पडलेल्या एसआयआर (मतदार सखोल तपासणी) मधून समोर आला असून एकूण ५ लाख १४ हजार ९५५ मतदारांपैकी तब्बल २ लाख १३ हजार ४५ मतदारांची नावे वगळल्यावरून समोर आला आहे.
हि नावे कायमस्वरूपी बाद होणार कि त्या मतदारांना त्यांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची संधी मिळणार, यावर संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.
नुकत्याच पार पडलेल्या एसआयआर कार्यक्रमांतर्गत तब्बल ४७ हजार ९०१ मतदारांचे मॅपिंगच झाले नसल्याचे समोर आले असून सुरु झालेल्या सुनावणीमध्ये त्यांच्या नावांची खातरजमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ४८ हजार ३७९ मतदारांच्या नोंदींमध्ये तांत्रिक विसंगती आढळून आल्याचे त्यांनी म्हटले. यावरून मीरा-भाईंदर विधानसभा मतदार संघातील एकूण ५ लाख १४ हजार ९५५ मतदारांपैकी सुमारे ३ लाख मतदारच वैध ठरले असून मागील पालिका निवडणुकीत एकूण मतदानापैकी तब्बल ५५ टक्के मतदान बोगस किंवा बनावट नोंदींवर आधारित होते, असा आरोप त्यांनी केला.
हा प्रकार शासनाच्या व निवडणूक आयोगाच्याच कागदपत्रांवरून उघड झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सन २०१९ मधील मतदार यादीतील भाग क्रमांक ४८७ मधील ५ लाख ६७ हजार ९७२ मतदारांपैकी सुमारे ५१ टक्के म्हणजेच १ लाख ४२ हजार ६६२ ते १ लाख ४८ हजार ४०७ मतदारांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित आहे.
या मतदारांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान हरकती व सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली असून ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. स्थानिक पक्षीय यंत्रणेच्या निष्काळजीपणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत निवडणूक प्रशासनाला क्लीन चिट दिली.
मागील पालिका निवडणुकीतील मतदानावेळी मोठ्या प्रमाणावर झालेली बोगसगिरी सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वेळीच लक्षात यायला हवी होती, अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.
प्रशासकीय फसवणुकीमुळेच सेनेचा तांत्रिक पराभव झाला, असा दावा त्यांनी केला. पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्यांनी चौकशीचा केवळ दिखावा केला, कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला.
मागील निवडणुकांमधील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करून त्यात विशेष रणनीती आखल्याचे त्यांनी म्हटले. एसआयआरमधून वगळण्यात आलेल्या मतदारांच्या संबंधित मतदार यादीतील पुनर्समावेशाबाबत ३० सप्टेंबरपर्यंत हरकत नोंदणी कालावधीत सेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन खऱ्या मतदारांचे हक्क सुरक्षित करण्याची मोहीम राबविणार आहेत. त्यांचे विशेष पथक या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असून भविष्यात अशी फसवणूक खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
सरनाईक यांचे आरोप बालीश व हास्यास्पद आहेत. याच यादीच्या आधारे शिवसेनेचे नरेश म्हस्के व प्रताप सरनाईक निवडून आले आहेत. तेव्हा यादी बोगस नव्हती का? ठाण्यात देखील दोन लाख मतदार वगळण्यात आले आहेत. मग ठाण्यातील शिवसेनेची सत्ता देखील बोगस मतांवर आली असे म्हणायचे का?- भाजप आ. नरेंद्र मेहता