नेवाळी : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टी आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धबधबे, नद्या, गडकिल्ले व इतर धोकादायक पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदीचे आदेश सोमवारी जारी केले आहेत. मात्र या आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत मंगळवारी अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डोंगराळ भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मलंगगड ची नदी आणि ओढे- नाले दुथडी भरून वाहत असताना कुशिवली, मलंगगड फ्युनिक्युलर परिसर, आंभे, खरड आणि ढोके गाव परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ दिसून आली आहे. अनेक पर्यटक नदीकाठी, धबधब्यांच्या परिसरात तसेच डोंगराळ भागात जाऊन फोटोशूट आणि व्हिडीओ चित्रीकरण करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
काही जण अति धोकादायक नदीपात्राच्या अगदी जवळ उभे राहून जीव धोक्यात घालत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संबंधित यंत्रणांनी धोकादायक ठिकाणी बॅरिकेडिंग, पोलीस बंदोबस्त किंवा प्रवेश रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात अशा कोणत्याही ठोस उपाययोजना दिसून न आल्याने पर्यटक बिनधास्तपणे बंदी असलेल्या ठिकाणी पोहोचत असल्याचे चित्र आहे.
श्री मलंगगड परिसरात दरवर्षी पावसाळ्यात बुडणे, पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणे आणि घसरून अपघात होण्याच्या घटना घडत असतात. तरीही जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून धोकादायक ठिकाणी तातडीने बंदोबस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.