Thane DCC Bank  pudhari photo
ठाणे

Thane DCC Bank Election : जिल्हा बँक निवडणूक वाद रंगला

मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानेच परिवर्तन पॅनलची स्थापना : कपिल पाटील

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या परिवर्तन पॅनलची घोषणा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केल्यानंतर महायुतीमध्ये नाराजी निर्माण होऊन फूट पडली आहे. तेव्हा परिवहन पॅनलची स्थापना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वन मंत्री गणेश नाईक आणि सर्व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानेच झाल्याचा दावा केला. तसेच मतदारांमध्ये संभ्रम पसरवत असल्याचा आरोप नामोल्लेख टाळून भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर केला.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपाने परिवहन पॅनलची घोषणा करीत ७ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यांनंतर वादाला सुरुवात झाली आणि नेत्यांना विश्वासात न घेता पॅनल जाहीर झाल्याचा आरोप होत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, परिवर्तन पॅनलची घोषणा झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाईन बैठक घेऊन भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्यानंतरही, मतदारांना संभ्रमात टाकण्याचा प्रकार सुरू आहे. आरोप करणाऱ्यांच्या पायाखालील वाळू सरकली असून, खोडसाळपणे आरोप करण्यापेक्षा ज्या कोणाला परिवर्तन पॅनलबाबत शंका आहे, त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर चर्चा करावी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वन मंत्री गणेश नाईक यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर परिवर्तन पॅनलची घोषणा करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही काही जणांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजप-शिवसेना महायुतीचे परिवर्तन पॅनल अधिकृत असून, त्याला प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री गणेश नाईक यांचा पाठिंबा आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पॅनलबरोबर राहणार असल्याची भूमिका शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आली. त्यामुळे भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले.

परिवर्तन पॅनलची घोषणा होण्यापूर्वीच, एका नेत्याच्या कार्यालयातून गेल्या १५ दिवसांपासून फोन करून भाजपचा उमेदवार व पॅनल असल्याचे सांगितले जात असल्याकडे कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. त्यांचे कार्यक्रमातून मतदारांना फोन जात होते, भाजपच्या पॅनलला मतदान करा, असे त्यांच्या नावाने आवाहन करण्यात येते होते, त्यांनी भाजपचा उमेदवार कोणाला विश्वासात घेऊन जाहीर केला आणि त्यांना भाजपाचे पॅनल ठरवण्याचा विशेष अधिकार प्राप्त आहे का, असाही प्रश्न कपिल पाटील यांनी उपस्थित केला.

मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकही जागा न घेता वसई विकाससोबत युती ह्याच व्यक्तीने केली होती. त्या वेळेला पक्षाच्या नेत्यांना असे सांगितले गेले की वसई विकास पक्षाने भाजपला ८ जागा सोडत आहेत. सेवा संस्थेच्या ८ मतदारसंघात वसई विकासची काहीही ताकद नव्हती, त्या जागा सोडण्याचा प्रश्नच येत नव्हता, अशी युती करून दिशाभूल करण्यात आली. तर आता ७ पैकी अवघी १ जागा घेऊन भाजपला इतर पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी खंत कपिल पाटील यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष स्तरावर प्रदेशाध्यक्षांपेक्षा कोणीही मोठा नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेवरून परिवर्तन पॅनल प्रमुख म्हणून काम पाहत आहे. तर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आग्रहामुळे भिवंडीतून संचालक म्हणून उमेदवारी अर्ज भरला, असे कपिल पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT