ठाणे : पुढारी वृत्तसेवा
परदेशातील समुद्रकिनाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील किनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्लू फ्लॅग' मानांकन मिळवण्यासाठी राज्यातील लाडघर, गुहागर, नागाव, श्रीवर्धन आणि डहाणू या पाच समुद्रकिनाऱ्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे.
या मानांकनासाठी आवश्यक ३३ निकष पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. काही दिवसांत डेन्मार्कस्थित संबंधित आंतरराष्ट्रीय समितीचे पथक या पाचही समुद्रकिनाऱ्यांची पुन्हा पाहणी करणार आहे. ब्लू फ्लॅग मानांकन केवळ समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यावर किंवा पर्यटक सुविधांवर दिले जात नाही.
पर्यावरणीय शिक्षण, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरणीय व्यवस्थापन, पर्यटक सुरक्षा व सेवा अशा ४ प्रमुख क्षेत्रांतील ३३ निकषांची पूर्तता करावी लागते. निवडलेल्या पाचही किनाऱ्यांवर आवश्यक सुविधांसह पर्यावरणीय निकषांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान पर्यटन विभागासमोर आहे.
समुद्रकिनाऱ्यावर नैसर्गिकरीत्या वाहून आलेले शेवाळ किंवा नैसर्गिक जैविक अवशेष सरसकट हटवण्याऐवजी पर्यावरणीय दृष्टिकोनातून त्यांचे व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. अनधिकृत तंबू, वाहनांची ये-जा व कचरा टाकण्यास प्रतिबंध असणे, तसेच पाळीव प्राण्यांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवणे तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
पर्यटन विभागाच्या डेन्मार्कस्थित संबंधित समितीसोबत तीन बैठका झाल्या. प्राथमिक पाहणीनंतर निवडलेल्या पाच समुद्रकिनाऱ्यांवर आवश्यक सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांत डेन्मार्कच्या पथकाकडून या समुद्रकिनाऱ्यांची पुन्हा पाहणी होईल. या पाहणीत ३३ निकषांची पूर्तता कितपत झाली, याचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यानंतर या किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.