किन्हवलीची कृषी कार्यालय इमारत धोकादायक pudhari photo
ठाणे

Thane News : किन्हवलीची कृषी कार्यालय इमारत धोकादायक

महत्त्वाचे दस्तावेज, फर्निचरला वाळवी लागण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

किन्हवली : संतोष दवणे

किन्हवली विभागातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजना व सुविधांविषयी मार्गदर्शन करणारे किन्हवली येथील कृषी कार्यालय बंद झाल्याने शेतकऱ्यांची ससेहोळपट सुरु आहे. या कार्यालयातील सर्व कर्मचारीवर्ग शहापूर कार्यालयाशी संलग्न केल्याने स्थानिक शेतकऱ्यांना कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी २८ किमी दूर शहापूर येथे चकरा माराव्या लागत असल्याने किन्हवली परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या तालुका कृषी कार्यालयांतर्गत शहापूर, खर्डी व किन्हवली अशी तीन मंडळ कार्यालये आहेत.शहापूर तालुक्यात किन्हवली येथील हे एकमेव शासकीय कृषी कार्यालय साधारण ४० वर्षांपासून मंडळ अधिकारी, पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, शिपाई, पहारेकरी अशा अधिकारी व कर्मचारी वर्गासहित शेतकऱ्यांना सेवा देत होते. मात्र किन्हवली कार्यालयाची इमारत मागील अनेक वर्षांपासून मोडकळीस आली असून ती धोकादायक बनल्याने शहापूर कृषी कार्यालयाने ५ ते ६ वर्षांपासून येथील कामकाज बंद केले आहे.परिणामी कर्मचारी वर्गही तालुका कार्यालयात वर्ग करण्यात आला आहे.

किन्हवली येथील कृषी कार्यालय बंद असल्याने ऐन मोसमात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खते, बियाणे, कृषी योजना आणि पीक विम्याच्या महत्त्वाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना किन्हवलीपासून २८ किलोमीटर अंतरावरील तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. हातातले काम सोडून गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना या कार्यालयाचा पत्ताच सापडत नसल्याने त्यांचा वेळ व प्रवास खर्चही वाया जातो आहे.

दरम्यान किन्हवलीच्या या कार्यालयाकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होत असून उघड्या खिडक्या, मोडलेला - कुजलेला दरवाजा, गळके छप्पर, छपरावर वाढलेले गवत अशी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे येथे असलेले काही दस्तावेज, महत्वाची कागदपत्रे पावसाच्या पाण्यात भिजून खराब होण्याची किंवा त्यांना वाळवी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांची फरफट थांबवण्यासाठी हे कार्यालय लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाने केली आहे.

शहापूर कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर ताबडतोब किन्हवली येथील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली आहे.जिर्ण इमारत दुरुस्ती किंवा पुनर्निर्माणासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने सध्यातरी तालुक्यातील तिन्ही मंडळांचा कारभार तालुका कार्यालयातूनच सुरू राहणार आहे.
कुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी, शहापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT