ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक ठाणे किल्ला अर्थात 293 वर्षे जुन्या ठाणे मध्यवर्ती कारागृह पडघ्यात हलवून त्या ठिकाणी पार्क उभारण्याचा डाव बिल्डर लॉबीने सुरु केला आहे. त्याविरोधात भाजपचे आमदार संजय केळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी (दि.29) विधी मंडळाच्या अधिवेशनात बुलंद आवाज करीत ऐतिहासिक किल्ला वाचविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या किल्ला हलविण्याची मागणी राबोडीतील एका विद्वानाने केल्याचा आरोपही आव्हाड यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.
स्वातंत्र्य लढ्याची अस्मिता असलेला ठाणे किल्ला अर्थात आत्ताचे ठाणे कारागृह 1727 मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतले होते. पुढे मराठ्यांचा पाडाव झाल्यानंतर बिटिशांनी किल्ल्याचे रूपांतर कारागृहात केले. या कारागृहाजवळ न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय असल्याने कैद्यांची ने-आण करणे सोपे आणि सुरक्षित आहे. तसेच या कारागृहात म्युरल्सच्या रूपाने इतिहास जागवणाऱ्या स्मारकाचे काम प्रस्तावित आहे. ठाण्याची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. असे असताना 293 वर्षे जुना ठाणे किल्ल्या पाडून त्या ठिकाणी पार्क उभारण्याचे प्रयन्त बिल्डर लॉबीने सुरु केले आहेत, असा हास्यापद प्रकार थांबवावा, या अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी करीत शुक्रवारी सभागृहात आवाज उठविला.
राज्यपालांच्या अभिभाषणात किल्ले संवर्धनासाठी निधी दिला जाणार आहे असे सांगितले. यासोबतच राज्यातील 11 किल्ले जागतिक ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्यासाठी राज्य सरकारने यादी तयार केली आहे. असे असताना ठाणे किल्ला तोडण्याचा प्रस्ताव बिल्डरांच्या हितासाठी होत असून आम्ही ठाणेकर ते कदापि होऊ देणार नाही. हा ऐतिहासिक वारसा जपावा, अशी मागणीही केळकर यांनी केली. या मागणीला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे किल्ला पहिले शाहू महाराज यांनी कसा ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी केली, त्या किल्ल्यातून कशी जलवाहतूक होत होती हे सभागृहाला सांगत किल्ला वाचविण्याची मागणी केली. तसेच हे कारागृह हलविण्याची कल्पना राबोडीतील एका विद्वानाने कशी पुढे आणली आहे, याचाही भांडाफोड केला आहे.