KDMC water theft Pudhari
ठाणे

KDMC water theft: कल्याण-डोंबिवलीतील पाणीचोरांवर संक्रांत; केडीएमसीच्या कारवाईत चोरीच्या शेकडो नळजोडण्या खंडित

बांधकामांसह गॅरेजना केडीएमसीच्या मुख्य जलवाहिनीचा छिद्रे पाडून पाणी चोरून घेतले जाते.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बेसुमार बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. शिवाय विविध भागात वॉशिंग सेंटरसह गॅरेज सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांसह गॅरेजना केडीएमसीच्या मुख्य जलवाहिनीचा छिद्रे पाडून पाणी चोरून घेतले जाते.

परिणामी एकीकडे परिसरातील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो, तर दुसरीकडे केडीएमसीचे पाणी महसुलाच्या माध्यमातून नुकसान होत असल्याचे लक्षात येताच आयुक्त अभिनव गोयल यांनी पाणी चोरांना वठणीवर आणण्यासाठी कारवाया करण्याचे फर्मान सोडल्यानंतर पाणी पुरवठा विभागाने चोरीच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. गुरूवारी दिवसभरात 100 चोरीच्या नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

अ प्रभाग हद्दीत टिटवाळा परिसरातील मोहिली भागात भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारताना या नळ जोडण्या घेतल्या असल्याची माहिती स्थानिकांनी केडीएमसीच्या पथकाला दिली होती. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि तोडकाम पथकाने अ प्रभाग हद्दीत टिटवाळा परिसरातील मोहिली भागात केडीएमसीच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून चोरून घेतलेल्या 70 नळ जोडण्या खंडित केल्या.

मुख्य जलवाहिनीवरून या चोरीच्या नळ जोडण्या घेतल्याने अधिकृत इमारती, घरात राहणाऱ्या रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असे. बनेली, वासुंद्री रोडसह बल्याणी परिसरात केडीएमसीच्या पथकाने नळ जोडण्या तोडण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी या बेकायदा बांधकामांच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

पश्चिम डोंबिवलीतील ह प्रभाग हद्दीमध्ये कोपर, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, सरोवरनगर, आदी परिसरात बेसुमार बेकायदा चाळींची बांधकामे फोफावली आहेत. रात्रीच्या सुमारास या बेकायदा चाळी उभारणाऱ्या भूमाफियांकडून केडीएमसीच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून चोरीच्या नळ जोडण्या घेत आहेत. जुनी डोंबिवली परिसरात तोडकाम पथकाने तेथील चोरीच्या 8 नळ जोडण्या खंडित केल्या. अशीच कारवाई या पथकाने कोपर, सरोवरनगर, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा भागात राबविण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

27 गावांत असलेल्या ई प्रभाग हद्दीतील भोपर गावामध्ये केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या निर्देशांनुसार पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे, शैलेश मळेकर, उपअभियंता उदय सूर्यवंशी, लिलाधर नारखेडे, अनुप धुवाड, कनिष्ठ अभियंता मोरेश्वर राणे, ओंकार भोईर यांनी आक्रमक कारवाई केली. या पथकाने चोरीच्या 14 नळ जोडण्या खंडित केल्या. या नळ जोडण्या तोडल्यानंतर त्याजागी लाकडाच्या खुंट्या अडकून ठेवण्यात आल्या आहेत.

नळजोडणी पुन्हा केल्यास फौजदारी कारवाई

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 23 टक्के पाणी गळती आहे. 25 टक्के पाण्याची चोरी केली जाते. या 48 टक्क्यांच्या हानीमुळे कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 27 गावांना 110 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत असल्याचे चित्र दिसून येत असले तरी प्रत्यक्षात 60 एमएलडी दररोज पाणी पुरवठा होतो.

उर्वरित 22 दशलक्ष लीटर पाणी बेकायदा ढाबे, गॅरेज, बांधकामांसह बेकायदा वस्त्यांना चोरून वापरले जाते. या साऱ्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागातर्फे अनधिकृत नळ जोडण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. तोडलेला पाणी पुरवठा पुन्हा जोडल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा शहर अभियंता अनिता परदेशी यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT