NCP Protest on KDMC Recruitment
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्या नोकर भरती प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेतून स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे डोंबिवली शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ भाऊ पाटील यांनी दंड थोपटले आहेत.
या संदर्भात केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांचे पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी उमेदवारांना अमान्य असलेली ही भरती प्रक्रिया रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशरतभाऊ पाटील यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून कागदपत्रेही जमा करून घेण्यात आली आहेत. मात्र या संपूर्ण भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांचा सहभाग अत्यल्प असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. एक टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणातच स्थानिक उमेदवारांचा समावेश असल्याने ही प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हटले जात आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे डोंबिवली शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ भाऊ पाटील यांनी आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन देऊन नोकर भरतीची ही प्रक्रिया आम्हाला अर्थात स्थानिक भूमिपुत्रांना मान्य नाही. या प्रक्रियेतून स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी/कोळी उमेदवारांना वगळण्यात आले आहे. राजकीय नेत्यांच्या सूचनांनुसार काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतील उमेदवारांना नोकरीत समाविष्ट करण्यात घेण्याचे षडयंत्र रचले आहे.
या प्रक्रियेत उत्तीर्ण झाल्यानंतर स्थानिक भूमिपुत्र मर्जीत राहून काम करतील की नाही ? याची नेते आणि अधिकाऱ्यांना भिती वाटत आहे. त्यामुळेच स्थानिक भूमिपुत्र या भरती प्रक्रियेपासून अनभिज्ञ राहण्याकरिता कन्सल्टन्सीची नेमणूक केली आहे. त्यामुळेच ही भरती प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी, याकडे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे पत्राद्वारे लक्ष मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास सर्व भूमिपुत्रांना एकत्र आणून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याचे भाऊ पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणावर आयुक्त अभिनव गोयल आणि महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार ? याकडे समस्त भूमिपुत्रांच्या नजरा लागल्या आहेत