डोंबिवली : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, जिथे सोय आणि आरामाला प्राधान्य दिले जाते, तिथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील एक अधिकारी आपल्या कृतीतून समाजाला पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश देताना दिसत आहेत. केडीएमसीच्या विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत हे दर बुधवारी सायकलवरून कार्यालयात येऊन नागरिकांसाठी एक सकारात्मक उदाहरण उभे करत आहेत.
घरातून कार्यालयाकडे ये-जा करणारा अवलिया अधिकारी प्रशांत भागवत यांना पाहून अनेकांना प्रथमदर्शनी वाटते की ते एखाद्या सायकल रॅलीसाठी किंवा स्पर्धेसाठी निघाले असावेत. मात्र प्रत्यक्षात हा उपक्रम कोणत्याही स्पर्धेसाठी नसून, पर्यावरण रक्षण, ऊर्जाबचत आणि सौर ऊर्जेबाबत जनजागृती करण्यासाठीचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. बुधवार हा त्यांच्यासाठी ‘सायकल डे’ असून, या दिवशी ते हमखास सायकलनेच कार्यालयात येतात.
मोठे पद आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असूनही प्रशांत भागवत यांची जीवनशैली अत्यंत साधी आहे. शासकीय अधिकारी म्हटलं की मोठी गाडी, वातानुकूलित कार्यालय आणि सामान्य नागरिकांपासून अंतर अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. मात्र प्रशांत भागवत ही प्रतिमा आपल्या कृतीतून बदलताना दिसतात. कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता, त्यांनी केडीएमसीच्या विविध प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत केली आहे. या उपक्रमांमुळे विजेचा वापर कमी झाला असून, पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढला आहे. ही बचत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, निसर्ग संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठीही महत्त्वाची ठरत आहे.
दर बुधवारी रस्त्यावरून जाणारी त्यांची सायकल नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण करते, मग आपण का नाही? कोणताही मंच, कोणतेही भाषण किंवा जाहिरात नसतानाही त्यांचा संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतो. कारण बदलाचा खरा प्रभाव आदेशातून नाही, तर कृतीतून निर्माण होतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
प्रशांत भागवत यांचा हा उपक्रम केवळ वैयक्तिक शिस्तीपुरता मर्यादित नसून, तो जबाबदार प्रशासन आणि जागरूक नागरिकत्वाचे उदाहरण ठरत आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पर्यावरण रक्षणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, अनेक नागरिकांना सायकल वापर आणि ऊर्जाबचतीकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. खरा बदल असा असतो. शांतनिरपेक्षपण खोलवर परिणाम करणारा आज प्रशांत भागवत यांची सायकल केवळ दोन चाकांवर धावत नाही. ती धावते त्या आशेवरकी आपलं शहरं अधिक स्वच्छ आणि सुंदर असतील. प्रदूषणमुक्त असतील आणि माणसांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखलेल्या शहरांसारखी असतील. कदाचित म्हणूनच प्रशांत भागवत यांची दर बुधवारी चालणारी ही एक शांत क्रांती भविष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल, अशी आशा आहे.