kalyan dombivali municipal corporation Zero Tolerance Campaign
डोंबिवली: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून कल्याण-डोंबिवलीचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. केडीएमसीने गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक बेजबाबदार नागरिकांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत केडीएमसीने झीरो टॉलरन्स धोरण अवलंबले आहे. उघड्यावर कचरा टाकणारे, राडारोडा टाकणारे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांचे सीसीटीव्ही व मोबाइल व्हॅनद्वारे फोटो/व्हिडिओ काढण्यात आले. त्यानंतर महापालिका कायदा 1949 च्या कलम 381 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 नुसार थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.
गेल्या 15 दिवसांत कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, कल्याण ग्रामीण परिसरातील 100 हून अधिक जणांवर बाजारपेठ, महात्मा फुले, मानपाडा, खडकपाडा, टिळकनगर आणि विष्णूनगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांना आता दंड नाही, थेट गुन्हा दाखल होणार. प्रत्येक वॉर्डात पथके नेमली आहेत, असा आयुक्त अभिनव गोयल यांनी या पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे.
दंडाऐवजी एफआयआर का ?
आतापर्यंत दंड आकारून सोडले जात होते. मात्र वारंवार सूचना देऊनही लोक ऐकत नसल्याने केडीएमसीने कठोर भूमिका घेतली आहे. गुन्हा दाखल झाल्यास 3 महिने कारावास किंवा 5 हजार रूपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. केडीएमसीच्या या धडक कारवाईमुळे कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आधी कचराकुंड्या द्या, मग गुन्हे दाखल करा
अशाने आता तरी लोक सुधारतील, अशी प्रतिक्रिया स्वच्छताप्रेमी नागरिकांकडून येत आहे. तर काहींनी आधी कचराकुंड्या द्या, मग गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे. केडीएमसीने नागरिकांना कचरा ओला/सुका वेगळा करून फक्त पालिकेच्या घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन केले आहे.