KDMC Polluted Water Farming Pudhari
ठाणे

KDMC Polluted Water Farming: केडीएमसीतील 27 गावांची शेती ‌‘दूषित पाण्यावर‌’

कल्याण पूर्वेतील माणेरे-द्वारलीतील कृषी पट्टा धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : शुभम साळुंके

कृषीप्रधान तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील कृषी क्षेत्र सध्या गंभीर धोक्याच्या उंबरठ्यावर आले आहे. कल्याण पूर्व विधानसभेतील आणि केडीएमसी क्षेत्रातील

27 गावांपैकी माणेरे आणि द्वारली परिसरात सुरू असलेल्या कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी उघड्या नाल्यांत सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हेच दूषित पाणी शेतकरी पंपाद्वारे शेतीसाठी वापरत असल्याने संपूर्ण कृषी पट्टा संकटात सापडला आहे.

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी नदी प्रदूषित झाल्यानंतर हरित लवाद आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरातील अनेक जीन्स कारखान्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारखानदारांनी ग्रामीण भागाचा आडोसा घेत पुन्हा माणेरे-द्वारली परिसरात उद्योग सुरू केल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या कारखान्यांमधील रासायनिक पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नैसर्गिक नाल्यांत सोडले जात आहे. या बेकायदेशीर प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून जलप्रदूषण झपाट्याने वाढत आहे. यावर अधूनमधून कारवाई होत असली तरी ती केवळ दिखाऊ ठरत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कारवाईनंतर काही दिवसांतच हे कारखाने पुन्हा सुरू होत असल्याने संबंधित प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दूषित पाण्यामुळे केवळ पिकांचे नुकसान होत नाही, तर भूजल पातळीही धोक्यात आली आहे. माणेरे गावाच्या हद्दीत सुमारे 25 ते 30 जीन्स कारखाने कार्यरत असल्याचा अंदाज असून, त्यांच्या सांडपाण्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा रंग काळा-निळा होत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे.

अनेक ठिकाणी तर खासगी बोअरवेलचे पाणीही दूषित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येथील प्रदूषणकारी कारखान्यांमुळे येथील परिसराची नैसर्गिक हानी सर्वाधिक होताना दिसून येत आहे.

दूषित पाण्यावर शेती

दरवर्षी पावसाळ्यानंतर या परिसरात उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा माणेरे परिसरात फळ भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी ज्वारी आणि मका या पिकांची लागवड झाली असली तरी स्वच्छ पाण्याअभावी शेतकऱ्यांना दूषित पाण्यावर शेती करावी लागत असल्याचे भीषण वास्तव आहे. त्यामुळे उत्पादन, मातीची सुपीकता आणि नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

या संपूर्ण प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. दूषित पाण्यावर शेती करण्याची वेळ आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT