भाईंदर: काशिमीरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरावरून सध्या मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापत आहे. अशातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजपचा व्यापारी चेहरा उघडा पडला असून त्यांनी सत्तेचा बाजार मांडला आहे. त्यांनी काशिमीरा नाका येथील छत्रपतींचा स्वाभिमान शॉपिंग मॉलसाठी गहाण ठेवण्याचा डाव मांडल्याचे टिकास्त्र भाजपवर डागले.
शॉपिंग मॉल उभारू पाहणाऱ्या व्यापाऱ्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नसल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले. काशिमीरा नाका येथील छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा हटविण्यासाठी भाजपने सत्तेचा बाजार मांडला असून हे पाप करणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
'सरनाईक यांनी हा आरोप पुराव्यानिशी केला असून त्यांनी 2017 मध्ये पालिकेत आ. नरेंद्र मेहता प्रणित भाजपची सत्ता असताना पुतळ्याच्या दोन्ही बाजूकडील पालिकेच्या मोक्याच्या भूखंडावर शॉपिंग मॉल उभारण्याचा घाट घातला होता. या मॉलच्या बांधकामात महाराजांचा पुतळा अडथळा ठरत असल्याने तो शहराबाहेर (घोडबंदर येथील जे. पी. इन्फ्रा गृहसंकुलासमोर) हलविण्याचा गुप्त प्रस्ताव तत्कालीन महासभेत मंजुरीसाठी आणला होता.
केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि खासगी कंपन्यांच्या कल्याणासाठी आराध्य दैवतालाच हटविण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. दोन किलोमीटर परिघात दुसरा पुतळा उभारता येत नाही, असा राज्य शासनाचा नियम असतानाही नवीन पुतळ्याचे राजकारण करून जुना पुतळा हटवण्याचा कट सत्ताधारी पक्षामार्फत रचल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला विरोध असूनही प्रशासकीय काळात जे.पी. इन्फ्रा येथील पुतळ्याचे काम पूर्ण झाले, मात्र सत्ता पुन्हा येताच मॉलच्या विषयासोबत पुतळा स्थलांतराचा विषय महासभेत घुसविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
महासभेतील विषयपत्रिकेवर एका बाजूला शॉपिंग मॉलचे विषय आणि दुसऱ्या बाजूला पुतळा स्थलांतराचा विषय घेणे, हेच सिद्ध करते की सत्ताधारी पक्षाला जनहित किंवा श्रद्धेशी काहीही देणे-घेणे नसून त्यांना केवळ शहराचे व्यापारीकरण करायचे आहे, असा गंभीर आरोप त्यांनी सत्ताधारी भाजपवर केला. शिवप्रेमींच्या भावनांशी खेळणाऱ्या प्रवृत्तीचा त्यांनी तीव्र निषेध करीत प्रसंगी छत्रपतींच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा निर्धार त्यांनी केला.