बदलापूर: रायगड जिल्हा आणि कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला मोठा फटका बसला. नेरळ आणि भिवपुरी स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ट्रॅकखालील खडी वाहून गेली, त्यामुळे पहाटेच्या सुमारास कर्जत–सीएसएमटी लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे मध्य रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कर्जत ते बदलापूरदरम्यान लोकल वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली. पाणी ओसरल्यानंतर आणि ट्रॅकची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती झाल्यानंतर सकाळी सहा वाजल्यानंतर हळूहळू लोकल सेवा पूर्वपदावर आणण्यात आली.
दरम्यान, अनेक लोकल गाड्या बदलापूर स्थानकातच रद्द करण्यात आल्याने कर्जत, भिवपुरी, नेरळ, वांगणी परिसरातील हजारो प्रवाशांचे मोठे हाल झाले. कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना तासन्तास स्थानकांवर खोळंबून राहावे लागले.
गाड्या रद्द झाल्याने बदलापूर रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी उसळली तर मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र सततचा पाऊस आणि कर्जत व खोपोली डाउन मार्गावरील गाड्या रद्द झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर येण्यास विलंब झाला.