Thane Kalyan rabies suicide case
डोंबिवली : स्वतःला भटका कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने त्यापासून होणारा त्रास आपल्या आई-वडिलांना सहन होणार नसल्याच्या भावनेतून बँकेत नोकरी करणाऱ्या ३० वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही धक्कादायक घटना कल्याण पूर्वेकडे असलेल्या तिसगांव नाका परिसरात रविवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास घडली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयेश विश्वनाश अमिन (३०) असे या तरूणाचे नाव असून त्याच्या पश्चात एक भाऊ आणि वृध्द आई-वडील असा परिवार आहे.
भटक्या कुत्र्यांची दहशत ठिकठिकाणी कायम आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी केली जात आहे. तथापी या समस्येवर ठोस कोणतीही उपाययोजना केला जात नाही. कुत्रे कधीही कुणावरही हल्ला करतात. त्यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही जणांना आपला जीव ही गमवावा लागला आहे. पण त्यापेक्षाही वेगळी आणि धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे.
तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटीच्या बी विंगमधील फ्लॅट क्रमांक ९०३ मध्ये राहणारा आयेश अमीन हा तरूण गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ भारत बँकेच्या ठाणे शाखेत नोकरी करत होता. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात एका भटक्या कुत्र्याने आयेशच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्याने केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जाते. मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना आयेश याने आपण आत्महत्या का करत असल्याची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या सुसाईट नोटमध्ये रेबिजमुळे जो त्रास आपल्याला होणार आहे तो त्रास आपले वृद्ध आई-वडील सहन करू शकणार नाहीत. त्यामुळे आपण आत्महत्या करत असून आपल्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे त्याने सदर नोटमध्ये म्हटले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलिस करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी अमिन कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करताना आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या. ही घटना अत्यंत वेदनादायक असून नागरिकांसाठी गंभीर इशारा आहे.
रूग्णाला वेळीच पूर्ण उपचारांची आवश्यकता महत्वाची
कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा धोका टाळण्यासाठी पूर्ण लसीकरण (Anti-Rabies Vaccine) वेळेत घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते योग्य वेळी पूर्ण उपचार घेतल्यास रेबिज पूर्णपणे टाळता येऊ शकतो. तसेच कुत्रा चावल्यानंतर भीती, गैरसमज किंवा लक्षणांबाबत संभ्रम निर्माण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मानसिक तणाव वाढल्यास कुटुंबीयांनी संबंधित व्यक्तीला भावनिक आधार देणे आणि आवश्यक असल्यास समुपदेशनाची मदत घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करणे, तसेच नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे ही काळाची गरज असल्याचे मत महेश गायकवाड यांनी या दुःखद प्रसंगी व्यक्त केले.