सापाड : कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर परिसरात ‘लस कल्याणाची’ उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरण जनजागृती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. झेड.एम.क्यू. एनजीओ आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता वाढवून लसीकरणाचे गैरसमज दूर करून बालकांचे वेळेवर आणि सुरळीत लसीकरण करण्यासाठी चर्चासत्रातून मन परिवर्तनासाठी महत्त्वाचे काम सुरू आहे. या चर्चासत्रात 27 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संपूर्ण चर्चासत्रात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत लसीकरण निगडीत विविध प्रश्न विचारत चर्चेत भाग घेतला. या चर्चासत्रात ‘लसीकरण जनजागृती’, ‘अफवा विरुद्ध वास्तव’ आणि पालक आणि समाज यातील सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चासत्राची सुरुवात झेड.एम.क्यू. एनजीओच्या शोभा यांनी स्वागत आणि प्रास्ताविकाने केली. त्यांनी लसीकरणाचे महत्त्व पटवून देत वेळेवर लस घेणे हे बालकांच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन केले.
तर ‘लस कल्याणाची’ या उपक्रमाची माहिती देऊन नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाप्रसंगी समाजातील प्रभावशाली नेतृत्व करणाऱ्या रेश्मा थॉमस आणि सलीम सुलेमान उपस्थित होते. रेश्मा थॉमस नर्सरी शिक्षिका असल्याने लसीकरणाचे फायदे उपस्थितांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. तर ‘लस कल्याणाची’ ग्रुपमधून मिळणारी माहिती स्वतःपर्यंत मर्यादित न ठेवता ज्ञानवृद्धीसाठी कशी उपयुक्त ठरली, हे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी ‘अफवा विरुद्ध वास्तव’, प्रश्नोत्तरे आणि क्विझच्या माध्यमातून सत्र अधिक संवादात्मक बनवले. तर दुसरे मत परिवर्तन करणाऱ्या सलीम सुलेमान यांनीही नागरिकांना लसीकरणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले.
चर्चासत्राला कल्याण-डोंबिवली महानगर- पालिकेच्या चिकन घर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सार्वजनिक आरोग्य परिचारिका संचित मोडक यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी लसीकरणाचे महत्त्व पटवून देत लसीकरणाचे फायद्याची सखोल माहिती दिली. तर महिलांना जडणाऱ्या कॅन्सर आजारावर शासनाकडून लसीबाबत सखोल माहिती देऊन वयात आलेल्या मुलींनी ही लस घेण्याचे आवाहन केले. तसेच झेड.एम.क्यू. एनजीओ कल्याण परिसरात डिजिटल माध्यमातून लसीकरणाबद्दल अचूक माहिती पोहोचविण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगत नागरिकांना ‘लस कल्याणाची’ व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
याशिवाय, इंदिरा नगर परिसरातील आशा सेविका संगीता रोजेकर यांनीही नागरिकांशी संवाद साधत लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. बालकांच्या वयानुसार कोणत्या टप्प्यावर कोणत्या लसी दिल्या जातात याची सविस्तर माहिती दिली, झेड.एम.क्यू. एनजीओच्या फील्ड टीममधील रहीम, शोभा, ज्योती आणि नगमा यांनी चर्चासत्राचे आयोजन करून हे चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडले. यावेळी अनेक नागरिकांना ‘लस कल्याणाची’ व्हॉट्सॲप चॅनेलशी जोडण्यात आले, ज्यामुळे त्यांना भविष्यातही लसीकरणासंदर्भातील अचूक माहिती मिळत राहणार असल्याचा विश्वास अनुप नायर यांनी व्यक्त केला.
पाच साल, सात बार...
सरतेशेवटी चर्चासत्रात उपस्थितांनी “पाच साल, सात बार-चुकू नये टीका एकही बार” हा नारा देत संपूर्ण लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी सहभागी नागरिकांना माहितीपत्रके व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. एकूणच, या सत्राला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लसीकरणाबाबत जागरूकता वाढीस लागल्याचे दिसून आले. ‘लस कल्याणाची’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होत असून बालकांचे संपूर्ण व वेळेवर लसीकरण करण्यासाठी समाज पुढे येत असल्याचे या चर्चासत्रातून दिसून आले.