डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील गांधारी गावात राहणारे अशोक लोखंडे यांच्या राहत्या घरात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास नागाच्या १५ - २० पिल्लांचा वावर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. सर्पमित्र कपिल कारभारी यांनी सापाची सर्व पिल्ले पकडून जंगलात सोडून वन्यजीव संरक्षणाचा संदेश दिला आहे.
या गावात अशोक लोखंडे हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या घरातील एका कोपऱ्यात सापाची वळवळणारी पिल्ले आढळून आल्याने लोखंडे कुटुंबीय भयभीत झाले होते. या पिल्लांचे पालकही परिसरात असावेत. या पिल्लांच्या संपर्कात गेल्यास त्यांच्या वा पालकांकडून जीवास धोका उद्भवू शकतो, या विचारांनी भयभीत झालेल्या अशोक लोखंडे यांनी तात्काळ नागाच्या पिल्लांविषयी माहिती दिली. माहिती कळताच कपिल कारभारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घराची पाहणी करून त्यांनी सर्व पिल्ले सुरक्षितपणे पकडली आणि एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये त्यांना बंद केले. त्यानंतर वनविभागाच्या नियमांनुसार ड्रममध्ये भरलेली ही पिल्ले शहरापासून दूर जंगलातील सुरक्षित अधिवासात नेऊन सोडली. नैसर्गिक अधिवासात पिल्ले सोडल्याने त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होईल, असे सर्पमित्र कपिल कारभारी यांनी सांगितले.
शहरीकरणामुळे अधिवास नष्ट
शहरीकरणामुळे सापांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगले, गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, नद्या, इत्यादी सर्व प्रकारच्या वन्यजीव अधिवासांवर मानवी अतिक्रमण होत आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीत शिरकाव करताना दिसत आहेत. गांधारी गावातील ही घटनाही त्याच भाग आहे. अशोक लोखंडे यांच्या घरात आढळलेली पिल्ले अतीविषारी सर्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोब्रा नागाची असल्याने लोखंडे कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. गांधारी हे गावखेडे असल्याने या गावातील परिसरात वारंवार लहान-मोठे, बिनविषारी आणि विषारी साप आढळून येत असल्याच्या घटना घडत असतात.
सापांबद्दल जनजागृतीची गरज
सापांविषयी जनमानसांत घृणास्पद वातावरण निर्माण झाले आहे. मात्र साप हा शेतकऱ्यांचा मित्र तर आहेच, शिवाय तो निसर्गाचा अविभाज्य घटक असल्याने त्याचेही जतन व्हायला हवे. यासाठी निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी आणि सर्पमित्रांनी सर्वसामान्य नागरिकांना सापांबद्दल आवश्यक माहिती मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला साप मानवी वस्तीत शिरकाव करण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्राला बोलावून साप पकडून जंगलात सोडण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कपिल कारभारी यांनी केले आहे. सर्पमित्र कारभारी यांच्या तत्परतेमुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अशोक लोखंडे यांनी सांगितले.