सापाड : गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले आहे. विसर्जन मिरवणुका जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर ‘नो पार्किंग’ लागू करण्यात येणार असून, गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश सावंत यांनी वाहतूक नियंत्रणाची अधिसूचना जारी केली आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी कोनगाव-दुर्गाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोनगावकडून कल्याणच्या दिशेने येणारी हलकी वाहने वाडेघर चौक आणि आधारवाडी चौक मार्गे वळविण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी मुख्य विसर्जन मार्ग टाळून या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोळसेवाडीकडून कोनगावच्या दिशेने जाणारी वाहने गोविंदवाडी बायपास मार्गे वळविण्यात येणार आहेत. तसेच कोनगावकडून डोंबिवली, मानपाडा, कल्याण फाटा आणि शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दुर्गाडी-गोविंदवाडी बायपास हा पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे. कोनगाव आणि दुर्गाडी गणेश घाट परिसरात वाहतूक कोंडी झाल्यास गांधारी पूल मार्गाचा वापर करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुका आणि नियमित वाहतूक सुरळीत राहावी, तसेच नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. विशेषतः कोनगाव-दुर्गाडी-गोविंदवाडी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
विसर्जन मार्गांवर वाहने पार्क करण्यास बंदी
विसर्जन मिरवणुका ज्या प्रमुख मार्गांवरून जाणार आहेत, त्या मार्गांवर ‘नो पार्किंग’ झोन लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर किंवा रस्त्याच्या कडेला वाहने उभी करू नयेत. पार्किंगमुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होऊन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.