नेवाळी: कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून आता ही समस्या केवळ काटई नाका किंवा मानपाडा चौकापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर कल्याणफाटा, डायघर, पडले आणि शिळफाटा परिसरातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा शेकडो वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.
कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार, कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचे तब्बल दोन ते तीन तास वाहतुकीत अडकून हाल झाले आहेत. मात्र वाहतूक कोंडी प्रश्नी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शुक्रवारी पहाटेपासून याच मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा सोमवारी सायंकाळी त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कल्याणफाटा आणि शिळफाटा या दोन्ही ठिकाणांहून कोणत्याही दिशेने जाणाऱ्या वाहनांना सुमारे चार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तब्बल दोन तास लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रशासन कसलं नियोजन करत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
वाहतूककोंडी वाढताच अनेक वाहनचालक चुकीच्या मार्गिकेतून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे समोरून येणारी वाहने अडकतात आणि कोंडी आणखी भीषण बनते. काटई नाका, मानपाडा चौक, कल्याणफाटा, डायघर आणि पडले परिसरात ही समस्या वारंवार दिसून येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई होत नसल्याने परिस्थिती अधिकच बिघडत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतरही वाहतूक पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचत नसल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे. कोंडी वाढल्यानंतर पोलिसांचे पथक दाखल होत असल्याने तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली असते. त्यामुळे कल्याण-शिळ मार्गावरील कोंडीचे हॉटस्पॉट निश्चित करून तेथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.