सापाड : योगेश गोडे
कल्याण शहरातील सदानंद चौक दररोजच वाहतूककोंडीच्या विळख्यात अडकत आहे. शुक्रवारी सकाळी कार्यालयीन वेळेत झालेल्या या कोंडीने चाकरमान्यांचे अक्षरशः नाकी नऊ केले. पत्रिपुल, दुर्गाडी पूल, शहाड पूल, गोविंदवाडी बायपास यांसारखी नवी वाहतूक साधने उभारल्यानंतरही शहराला वाहतूककोंडीच्या ग्रहणातून सुटका होत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. सदानंद चौक आणि परिसरातील वाहतूककोंडी ही केवळ एक दिवसाची समस्या नाही. ती दररोजची वास्तवता आहे. नागरिकांनी “वाहतूक कोंडी ही कल्याणकरांचे रोजचे ग्रहण झाले आहे,” असे सांगत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
वाहनांच्या रांगा इतक्या वाढल्या की, अवघ्या शंभर मीटर अंतर कापण्यासाठी तब्बल तासभर वेळ लागत होता. कामावर जाणार्या नोकरदार वर्गाची पावले मंदावली, शाळकरी विद्यार्थी उशिरा पोहचले आणि अडकलेल्या वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या नावाने अक्षरशः शिमगा केला. सदानंद चौकामध्ये चारही बाजूंनी येणार्या वाहनांनी एकमेकांना आडवे तिडवे अडवून ठेवले होते.
परिणामी चौकात चतुरसीमा जाम झाली. नागरिकांनी स्वतः पुढे होऊन वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येकालाच घाई असल्यामुळे स्थिती अधिकच गंभीर झाली. फुटपाथ बळकावण्यात आल्याने पादचार्यांना रस्त्यावरूनच मार्ग काढावा लागत होता. गर्दीच्या ठिकाणी गोंधळात पादचार्यांची तारांबळ उडाली. गर्दीत अडकलेली रुग्णवाहिका तब्बल अर्धा तास पुढे सरकू शकली नाही. या वाहतूककोंडीमुळे कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक करत होते.
शहरात साधारण 39 वाहतूक पोलिसांची नियुक्ती असली तरी प्रत्यक्षात ड्युटीवर फारच कमी पोलिस दिसतात. अनेक पोलीस मदतनीस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी केवळ वाहनांचे फोटो काढण्यात गुंतलेले असतात. वाहतूक कोंडीच्या पॉइंटपेक्षा वाहतूक पोलीसच जास्त आहेत, पण शिस्त लावण्यात मात्र पूर्ण अपयश ठरत आहे, असा टोला स्थानिक नागरिकांनी लगावला.