डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत मोठा गोंधळ आणि पक्षपात होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधताना संबंधित बीएलओवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
यापूर्वीही आमच्या पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत की, एसआयआर प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे.
दरम्यान नियुक्त करण्यात आलेले बीएलओ हे जर अशाच प्रकारे काम करत राहिले, तर अनेक मतदारांची नावे ही मतदार यादीतूनच बाद होतील आणि निष्काळजी बीएलओमुळे भारतीय मतदारांचा हक्क हिरावून घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
एकाच घरात दोन न्याय
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक बीएलओने घरोघरी तीन वेळा येऊन मतदाराची एसआयआर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र कल्याण ग्रामीणमधील यादी भाग क्रमांक १२९ वर नियुक्त बीएलओ यांनी माझ्या घरी एकदाही भेट दिलेली नाही, ही दुर्दैवी आणि खेदजनक बाब असल्याचे जिल्हाध्यक्ष अभिजित सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे त्यांच्याच कुटुंबातील आई आणि पत्नीचे नाव यादी भाग क्र. १२८ मध्ये आहे. तेथील बीएलओ घरी येऊन प्रक्रिया पूर्ण करून गेले. त्याच घरात एकाची प्रक्रिया होते आणि दुसऱ्याची होत नाही, हा भेदभाव कशासाठी? असा सवाल जिल्हाध्यक्ष अभिजित सावंत यांनी उपस्थित केला आहे.
कारवाई हवी...
सुरू केलेली एसआयआर प्रक्रिया सदोष आहे, त्याचा पुनर्विचार करावा. पक्षपात करणाऱ्या, तसेच कर्तव्याची जाणिव विसरून काम करणाऱ्या संबंधित बीएलओवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या निवेदनावर आपला दुर्दैवी मतदार अशी स्वाक्षरी करून उबाठाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.