Smuggling Case Pudhari
ठाणे

Smuggling Case: लोहमार्ग पोलिसांकडून ५ आंतरराज्यीय तस्करांवर झडप

गोवा ते ओडिसापर्यंत पसरलेली गांजा तस्करांची टोळी गजाआड; २२ किलो गांजा जप्त

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: गोवा, ओडिसा आणि महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या महत्प्रयासाने गजाआड करण्यात यश मिळविले आहे. गेल्या महिन्यापासून या टोळीचा शोध घेणारे विशेष पथक गोवा आणि ओडिसापर्यंत जाऊन कारवाई करून परतले आहे. अटक करण्यात आलेल्या आंतरराज्यीय पाच जणांच्या टोळीला न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

निक्कीकुमार साह (१९, रा. उलाव, तहसील बिहार), कुलदिप मंडल (२६, रा. उलोव, बिहार), अशरोफ खान (२७, रा. सालसे, जि. साऊथ गोवा), विद्याधर नायक (४३) आणि श्रीकांत प्रधान (३८) दोघे राहणार सुजामाजाऊ, ओडीसा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गांजा तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुरुवातीला निक्कीकुमार साह आणि कुलदीप मंडल या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला होता.

लाखो रुपये किंमतीच्या या गांजाची चौकशी करताना हा माल ओडिसा राज्यातून आणून गोवा येथील पुरवठादाराला देण्यासाठी नेला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

ही आंतरराज्य टोळी असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास वानखेडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल वाणी-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार अमित बेडेकर, हेमंत पाटील, अमोल सूर्यवंशी आणि अंकुश घायगोडे यांचे शोध पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण, आरोपींच्या मोबाईलमधील माहिती आणि आर्थिक व्यवहार तपासून या गांजाचा मुख्य पुरवठादार दक्षिण गोव्यात असल्याचे शोधून काढले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी मडगाव येथून मुख्य पुरवठादार अशरोफ खान याच्या मुसक्या आवळल्या.

आशरोफ याने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास ओडिसातील कंधमाल जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम डोंगराळ भागापर्यंत पोहोचला. दारिंगबाडी पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी तेथून विद्याधर नायक या तस्कराला जेरबंद केले. नायकने चौकशीत आपण ओडिसातील नक्षलग्रस्त भागात गांज्याची शेती करणाऱ्या श्रीकांत याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी नक्षलग्रस्त भागात सहा दिवस तळ ठोकून जंगलात शोध मोहीम राबविली. तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला दुर्गम भागातून मोठ्या कौशल्याने श्रीकांत प्रधान याला ताब्यात घेण्यात आले.

अशी तोडली गांजा तस्करीची शृंखला दरम्यान गांजा तस्करीतील या पाचही आरोपींचा स्थलांतर आदेश न्यायालयाकडून मिळवून त्यांना ओडिसातून कल्याणला आणण्यात आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून गांजाचा मुख्य पुरवठादार, मध्यस्थ, साठवणुकीचे अड्डे आणि गोवा तसेच महाराष्ट्रातील वितरणाची संपूर्ण साखळी ही पोलिसांनी उघड केली आहे.

काही महिन्यांपूर्वी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पोलिसांनी ओडिसा आणि महाराष्ट्रात गांजा तस्करी करणाऱ्या २० जणांच्या आंतरराज्यीय टोळीलाही अटक करण्‍यात आली होती. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने आणि त्यांच्या पथकाने केलेली ही कारवाई देखील‍ लक्षवेधी ठरली आहे. या कारवाईत २२ किलो गांजा जप्त करण्‍यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT