Tree Cutting Pudhari File Photo
ठाणे

Tree Cutting: कल्याणात विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल?

गांधारी भंडारी चौक ते वसंत व्हॅली काँक्रीट रस्त्यासाठी 22 वड-पिंपळांसह छायादार वृक्षांची तोड

पुढारी वृत्तसेवा

योगेश गोडे

सापाड: कल्याण-डोंबिवली महानगर-पालिका हद्दीतील विकासकामांमुळे पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गांधारी भंडारी चौक ते वसंत व्हॅली या मार्गावर सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी तब्बल 22 छायादार वृक्षांची तोड करण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरिक राजेश कुमार यांनी केला आहे.

या वृक्षांमध्ये वड, पिंपळ यांसारख्या पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वृक्षांचा समावेश असल्याचे सांगितले जात असून, या प्रकारामुळे विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोलाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून गांधारी भंडारी चौक ते वसंत व्हॅली या परिसरात काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे काम सुरू करण्यात आले असले, तरी या कामादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक वर्षांपासूनची मोठी झाडे तोडण्यात आली. या झाडांमुळे परिसरात नैसर्गिक सावली, शुद्ध हवा आणि तापमानावर नियंत्रण राहत होते.

याचबरोबर अनेक पक्षी, खारी आणि इतर जीवांचा हा नैसर्गिक अधिवास होता. झाडांची तोड झाल्यानंतर परि-सरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराचा विकास आवश्यक असला, तरी त्यासाठी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. अनेकांनी या वृक्षतोडीचा निषेध करत पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेने अधिक संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे केडीए मसीच्या वतीने दरवर्षी 'झाडे लावा, झाडे जगवा' अभियान राबविले जाते. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हजारो रोपांचे वृक्षारोपण केले जाते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी विविध जनजागृती मोहीमही राबविली जाते.

मात्र दुसरीकडे विका-सकामांच्या नावाखाली प्रौढ आणि छायादार वृक्षांची तोड होत असल्याचे चित्र समोर येत असल्याने महापा-लिकेच्या पर्यावरण धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे एका प्रौढ वड किंवा पिंपळाच्या झाडाची पर्यावरणीय क्षमता शेकडो लहान रोपांपेक्षा अधिक असते. अशी झाडे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, ऑक्सिजन निर्माण करतात, तापमान नियंत्रित ठेवतात आणि जैवविविधतेचे संरक्षण करतात.

त्यामुळे अशी झाडे तोडण्यापूर्वी सर्व पर्यायांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असते. रस्त्याच्या आराखड्यात बदल करून अथवा आवश्यक तेथे रस्त्याची रुंदी कमी जास्त करून अनेक झाडे वाचविता आली असती. मात्र असा पर्याय विचारात घेण्यात आला का? याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या 22 वृक्षांच्या तोडीसाठी महापालिकेने अधिकृत परवानगी दिली होती का? वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घेण्यात आली होती का ? तसेच तोडलेल्या प्रत्येक वृक्षाच्या बदल्यात किती वृक्ष लावले जाणार आहेत आणि त्यांचे संगोपन कोण करणार आहे, याची माहिती नागरिकांसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

गांधारी परिसरातून वसंत व्हॅली रस्त्यात नवीन काँक्रीट करण्याचे काम सुरू असून या कामात 21 वृक्षांची कत्तल करण्यात आली असून या वृक्षतोडीमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजगी व्यक्त होताना दिसत आहे एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिका विकासाच्या नावावर वृक्षांची कत्तल करताना दिसत आहे वसंत व्हॅली ते गांधारी चौकापर्यंतच्या काँक्रीटच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून या काँग्रेसच्या स्स्त्यातून अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. राकेश दळवी. स्थानिक रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT