कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात योग्य प्रकारे आरोग्य उपचार मिळत नसल्याच्या विविध घटना समोर आल्याने महापालिकेच्या आरोग्य खात्याने नऊ डॉक्टरांच्या बदल्या केल्या आहेत. या आदला बदलीने आरोग्य सेवा सुधारणा आहे का? असा सवाल महापालिकेतील सदस्यांनी उपस्थित केला आहे.
डॉ. विनोद दोंड हे शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत होत. त्यांची बदली महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागात करण्यात आली आहे. डॉ. पौर्णिमा ढोके या आरोग्य मुख्यालयात होत्या. त्यांची बदली डोंबिवलीतील मढवी नागरी आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. डॉ. प्रतिभा पानपाटील या मढवी नागरी आरोग्य केंद्रात होत्या.
त्यांची बदली शास्त्रीनगर रुग्णालयात करण्यात आली आहे. डॉ. पराग मढवी, विजय कुवर आणि संदीप पगारे हे रुक्मिणीबाई रुग्णालयात होते. त्यांची बदली शास्त्रीनगर रुग्णालयात करण्यात आली तर शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. संतोष केंभावी, कविता मढवी आणि प्रशांत चौधरी हे शास्त्रीनगर रुग्णालयात होते.
त्यांची बदली रुक्मिणीबाई रुग्णालयात करण्यात आली आहे. जुलै महिन्यात शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय सेवा चर्चेत आली होती. त्यानंतर एका रुग्णाला चांगले उपचार दिले जात नसल्याची घटना समोर आली.
रुक्मिणीबाई रुग्णालयात एका अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई राहिल्याची धक्कादायक घटना घडली. तर एक रुग्णाचा पाय फॅक्चर झाल्यावर त्याला उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले असता त्याच्या पायाला प्लास्टर ऐवजी पुठ्ठा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
या घटनांच्या आधी एका सदस्याने स्थायी समितीच्या सभेत रुग्णांना उपचारासाठी वापरले जाणारे बँडेज निकृष्ट दर्जाचे असल्याचा खुलासा केला होता. शास्त्रीनगर रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी सुवर्णा सरोदे या महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता.