SSC HSC Exams
डोंबिवली : २० फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत दहावी आणि १० फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षांच्या या कालावधीत कल्याण-डोंबिवलीमध्ये परीक्षार्थींना सर्वाधिक त्रास वाहतूक कोंडीचा होत असतो. मात्र, सद्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा त्रास कल्याण-डोंबिवलीकर परीक्षार्थींना होता कामा नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन भाजप वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए, तसेच वाहतूक नियंत्रण विभागाला जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी निवेदन दिले आहे. कल्याण-डोंबिवलीकरांसह रिक्षाचालक आणि इतर वाहनचालक नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळले आहेत. दररोज सकाळ/संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही, तसेच शाळेतून सुटल्यानंतर घरी वेळेत पोहोचता येत नाही. दहावी/बारावीच्या परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता येणे महत्वाचे आहे.
कल्याण-डोंबिवलीमधील मेट्रो प्रकल्पाची कामे काटई नाका, पलावा, मानपाडा, सोनारपाडा, दावडी, रिजन्सी अनंतम् गेट, टाटा पॉवर, सूचक नाका, पत्री पूल, बैल बाजार, कल्याण स्टेशन परिसर या भागात सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. २० फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत दहावी, तर १० फेब्रुवारी ते ११ मार्च रोजी बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या कालावधीमध्ये मेट्रोचे काम बंद ठेवावे, जेणेकरून विद्यार्थी वेळेत परीक्षाकेंद्रांपर्यंत पोहोचतील. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाचालक इतर वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. असेही मेट्रो सारखे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत.
त्यामुळे दहावी, बारावी परीक्षेच्या वेळेमध्ये मेट्रोचे काम बंद ठेवावे, अन्यथा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावर एमएमआरडीए आणि वाहतूक नियंत्रण विभाग या दोन्ही यंत्रणा काय निर्णय घेतात याकडे परीक्षार्थी, पालक, रिक्षाचालक आणि विद्यार्थ्यांना साह्य करणाऱ्या वाहनचालकांच्या नजरा लागल्या आहेत.