कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती रहिवाश्यांच्या जीविताला धोकादायक बनल्या आहेत. पालिका प्रशासन केवळ धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्याचे काम करून आपले हात झाकून टाकत असल्याने आजही धोकादायक इमारतीचा प्रश्न आवासून उभा राहिला असल्याने पालिका प्रशासन इमारती कोसळून जीवित हानी होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सुमारे साडेपाचशेहून अधिक इमारती धोकादायक व अतिधोकादायक इमारती जीर्ण मरणासन्न अवस्थेत उभ्या आहेत. पावसाळा तोंडावर आला की पालिका प्रशासन पालिका क्षेत्रातील दहा प्रभाग क्षेत्र कार्यालय हद्दीत असलेल्या धोकादायक व अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर करून त्यांना नोटीसा बजावण्याचे काम नित्य नियमाने दरवर्षी करत असते. नोटीसा बजावण्या पलीकडे पालिका प्रशासन कोणतेच काम करीत नसल्याने या जुन्या इमारतीचे मालक इमारत कोसळण्याची वाट पाहत असतात.
काही दिवसा पूर्वी डोंबिवली पूर्वे कडील गोपाळनगर 2 मधील आधार इमारतीतील पहिल्या मजल्या वरील घराचा स्लॅब तळ मजल्यावरील घरावर कोसळला होता. यात तीन जण जखमी झाले होते. डोंबिवली, कल्याणात आजही तीस ते चाळीस वर्ष जुन्या झालेल्या इमारती धोकादायक अवस्थेत मरणासन्न उभ्या आहेत.
याही इमारती कोसळण्याच्या स्थितीत उभ्या आहेत. डोंबिवली पूर्वे कडील भर स्टेशन परिसरातील वाहतूक पोलिस ऑफिस समोरील जुने लक्ष्मी हॉस्पिटल असलेली सुमती निवास ही दोन मजली इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीतील रहिवाश्यांच्या खोल्या रिकाम्या करण्यात आल्या होत्या. गेल्या काही वर्षा पासून या रिकाम्या असलेल्या धोकादायक इमारतीला पालिका प्रशासन नोटीसा पाठवण्या पलीकडे कोणतीच इमारत निष्कासित करण्याची कारवाई नाही तर इमारत मालकाला काही पडली नाही.